ऑनलाईन टीम / मुंबई :
वीजबिल माफी देता येणार नसल्याचे महाराष्ट्र सरकारने स्पष्ट केल्यानंतर मनसे वीजबिल माफीच्या मुद्द्यावरून आक्रमक झाली आहे. कोरोना काळात आलेली वाढीव वीज बिले सोमवारपर्यंत माफ करा, अन्यथा राज्यात जिल्ह्या जिल्ह्यात जनआंदोलन करण्यात येईल, असा इशारा मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी आज दिला.
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसे पदाधिकाऱ्यांची आज बैठक पार पडली. या बैठकीत वाढीव वीजबिलाविरोधात आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी ही घोषणा केली.
ते म्हणाले, राज्यातील जनतेला वाढीव वीजबिल आले. सरकारने हे बील कमी करण्याचे आश्वासन दिले होते. आम्ही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यापासून ते शरद पवारांपर्यंत सर्वांना निवेदने दिली. पण वीजबिल माफ झाली नाही. उलट ऊर्जामंत्र्यांनी शब्द फिरवून महाराष्ट्राचा घोर अपमान केला. त्यामुळे राज्यातील जनतेची फसवणूक झाली असून जनतेत संतापाची भावना आहे.
त्यामुळे आम्ही सरकारला येत्या सोमवारपर्यंत वीजबिल माफ करण्याचा अल्टिमेटम देत आहोत. जर वीजबिल माफ नाही केले तर सोमवारनंतर जिल्ह्या जिल्ह्यात उग्र आंदोलने केली जातील आणि त्यातच लोकांचा संयम सुटला आहे. पब्लिक क्राय झाल्यास त्याला जबाबदार सरकारच असेल, असा इशाराही नांदगावकर यांनी यावेळी दिला.
- शरद पवारांना सरकारमध्ये किंमत नाही
दरम्यान, वाढीव वीजबिलं माफ करण्याबाबत राज ठाकरे स्वतः ज्येष्ठ नेते शरद पवार यांना भेटले होते. त्यावेळी त्यांना निवेदन देण्यास सांगण्यात आले. त्यावर विविध कंपन्यांची निवेदनंही पवारांकडे पाठवण्यात आली. मात्र, त्यावर अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही. आम्हाल शरद पवारांवर विश्वास आहे, पण आता त्यांनाही सरकारमध्ये किंमत राहिलेली नाही असे आम्हाला वाटतेे.