ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचा इशारा
प्रतिनिधी /पणजी
देशभरात ओमिक्रॉनची प्रकरणे वाढत असून महाराष्ट्रासह सहा राज्यांमध्ये रात्रीच्यावेळी संचारबंदी जारी करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कोविडसंदर्भातील राज्य कृती दलाच्या महत्त्वपूर्ण बैठकीत सोमवारपासून नव्याने कडक पाऊले उचलण्याचा इशारा दिला आहे. विदेशातून येणाऱया पर्यटकांची कोणत्याही परिस्थितीत तपासणी झालीच पाहिजे, असे निर्देशही त्यांनी दिले. राज्यातील जनतेला सतर्कतेचा इशारा दिला आहे. राज्यात कोविड बाधितांच्या प्रमाणात वाढ झालीय. याबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केंद्राकडून सावधानतेचा इशारा देणारा सूचनावजा सल्ला आल्यानंतर व देशातील अनेक राज्यांमध्ये कोविडने पुन्हा डोके वर केले तसेच गोव्यातील बाधितांचे प्रमाण 1.3 वरून आता ते 1.6 पर्यंत वाढीस गेल्याने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी चिंता व्यक्त केली. सायंकाळी उशिरापर्यंत त्यांनी महत्त्वाची टास्क फोर्सची बैठक घेतली त्यात अनेक आरोग्याधिकारी व विविध सरकारी यंत्रणेचे प्रमुख उपस्थित होते. बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला उद्देशून प्रसारित केलेल्या संदेशात जनतेला कोविडची पुढील पायरी म्हणजे ओमिक्रॉन, त्यापासून अत्यंत सावध राहण्याचा सल्ला दिला आहे.
सोमवारपासून राज्यात सर्वत्र मुखपट्टी (मास्क)ची पुन्हा एका सक्ती करण्याची शक्यता व्यक्त केली. इतर राज्यांमध्ये रात्रीच्यावेळी संचारबंदी लागू केलेली आहे. गोवा हे पर्यटन केंद्र आहे. इथे मोठय़ा प्रमाणात विदेशातून पर्यटक येतात. अशा पर्यटकांची तपासणी तसेच कोविड बाधित नसल्याचे प्रमाणपत्रही सक्तीचे केले आहे. येणाऱया विदेशी पर्यटकांच्याबाबतीत राज्यातील सर्व हॉटेलचालकांना खबरदारीचे उपाय हाती घेण्यास सांगितले आहे. राज्यात ओमिक्रॉनचा एकही बाधित सध्या सापडला नसला तरी काणी गाफिल राहू नये. कोविडबाधितांचे प्रमाण वाढतेय ही चिंतेची बाब असल्याचे म्हटले आहे. बुधवारी आणखी एक बैठक घेऊन त्यात पुढील कडक धोरण निश्चित केले जाणार आहे. सोमवारी या संदर्भात ऍडव्हायजरी जारी केली जाणार आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
…तर निवडणुका पुढे ढकलणार ?
दरम्यान, नवी दिल्लीहून उशिरा मिळालेल्या माहितीनुसार देशात ओमिक्रॉनच्या रुग्णसंख्येत वाढ झाली व परिस्थिती गंभीर बनली तर राज्यातील निवडणुका काही काळ पुढे ढकलण्याची शक्यता आहे. गोव्यासह पंजाब, उत्तराखंड, उत्तर प्रदेश व मणिपूर या राज्यात मार्च 11 पर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण होणार आहे. त्या अनुषंगाने निवडणूक आयोगाने हालचाली सुरू केल्या आहेत. तथापि सध्या कोविड बाधितांची संख्या गोव्यातही वाढू लागल्याने गोव्यातील निवडणुका देखील 2 ते 3 महिने पुढे ढकलल्या जाऊ शकतात.