शिक्षणमंत्री एस. सुरेशकुमार यांचे स्पष्टीकरणः केंद्र सरकारकडून निर्देश आल्यानंतरच वर्ग सुरू करण्याबाबत निर्णय
प्रतिनिधी/ बेंगळूर
कोरोना परिस्थितीमुळे राज्यातील शाळा-महाविद्यालये केव्हापासून सुरू होतील, असा प्रश्न सातत्याने उपस्थित केला जात आहे. दरम्यान, राज्यातील नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा-महाविद्यालये 21 सप्टेंबरपासून सुरू केल्या जातील. परंतु, वर्ग भरविले जाणार नाहीत. केंद्र सरकारने निर्देश दिल्यानंतरच शाळांमध्ये नियमित वर्ग सुरू करण्यासंबंधी निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणमंत्री एस. सुरेशकुमार यांनी दिली आहे.
म्हैसूर येथे पत्रकारांशी ते बोलत होते. यंदा जून महिन्यापासूनच मुलांच्या शालेय प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ होतो. मात्र, कोरोना परिस्थितीमुळे या प्रक्रियेला विलंब झाला आहे. 21 ते 30 सप्टेंबरपर्यंत पहिली ते दहावीपर्यंतची प्रवेश प्रकिया पूर्ण करावी, अशी सूचना मंत्री सुरेशकुमार यांनी दिली आहे.
शाळा सुरू करण्यात येत असल्या तरी नियमितपणे तासिका घेण्यासंबंधी केंद्र सरकारने अद्याप कोणतेही निर्देश दिलेले नाहीत. त्यामुळे अभ्यासक्रम किंवा नियमित वर्ग घेतले जाणार नाहीत. केंद्र सरकारने परवानगी दिल्यानंतरच नियमितपणे वर्ग घेण्यास प्रारंभ करण्यात येईल. शाळेत येण्यासाठी विद्यार्थ्यांवर शाळांना दबाव आणू नये, अशा इशारा त्यांनी दिला आहे. दरम्यान, सर्व शिक्षकांना, प्राध्यापकांना शाळांमध्ये सक्तीने हजर रहावे लागणार आहे.
जादा शुल्क आकारणी नको!
कोरोना परिस्थितीमुळे सर्वांची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. त्यामुळे खासगी शाळांनी यंदा शुल्कवाढ करू नये. जमल्यास शुल्कात कपात करावी. खासगी शाळांना पालकांकडून एका टर्ममधील शुल्क जमा करण्याची सूचना देण्यात आली आहे. जर शाळांनी जादा शुल्क आकारल्यास पालकांनी, नागरिकांनी स्थानिक गटशिक्षणाधिकारी किंवा जिल्हा शिक्षणाधिकाऱयांकडे तक्रार करावी, असे आवाहन शिक्षणमंत्र्यांनी केले आहे.
सुरक्षेसंबंधी नियमांचे पालन आवश्यक
कोरोना परिस्थितीमुळे यंदा शाळा-महाविद्यालये सुरू करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे अनेक खासगी, सरकारी शाळांनी ऑनलाईनद्वारे शिक्षण देण्यास प्रारंभ केला आहे. 21 पासून शाळा-महाविद्यालये सुरू होत असून सुरक्षेच्या दृष्टीने सॅनिटायझिंग, थर्मल स्क्रिनिंग, सामाजिक अंतर व इतर आरोग्यविषयक सुरक्षा नियमांचे पालन करावे लागणार आहे.