प्रतिनिधी/ बेळगाव
कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर गेल्या 9 महिन्यांपासून न्यायालयीन कामकाज ठप्प झाले होते. काही दिवसांपूर्वी न्यायालयांतील कामकाज सुरू केले तरी पक्षकार, साक्षीदार आणि इतरांना मात्र प्रवेश नाकारण्यात येत होता. मात्र, ज्या जिल्हय़ांमध्ये 200 पेक्षा कमी सक्रिय कोरोना रुग्ण आहेत तेथील न्यायालयीन कामकाज पूर्ण क्षमतेने सुरू करावे, असा आदेश उच्च न्यायालय बेंगळूर यांनी दिला आहे. त्यामुळे आता बेळगाव न्यायालय सोमवार दि. 18 पासून पुन्हा पूर्ण क्षमतेने सुरू होणार असून साऱयांनाच दिलासा मिळाला आहे.
न्यायालयामध्ये अनेक खटले प्रलंबित आहेत. ते निकालात काढण्यासाठी प्रयत्न सुरू होते. मात्र, कोरोनामुळे ऑनलाईनद्वारे हे खटले दाखल करून घेतले तसेच काही खटले निकालातही काढले. काही महिन्यांपूर्वी कोरोनाची रॅपिड चाचणी करून पक्षकारांना प्रवेश देण्यात आला. मात्र, तरीदेखील जनतेमध्ये आणि वकिलांमध्ये नाराजी होती. न्यायालये सुरू करावीत, अशी मागणी वकिलांबरोबरच पक्षकारांनी केली होती. पण उच्च न्यायालयाच्या मार्गसूचीनुसार न्यायालय सुरू करणे अवघड झाले.
आता बेंगळूर शहर, बेंगळूर ग्रामीण, चिक्कबळ्ळापूर, मंगळूर, म्हैसूर, शिमोगा आणि तुमकूर हे सात जिल्हे वगळून राज्यातील सर्व न्यायालये सुरू होणार आहेत. गेल्या दहा दिवसांमध्ये ज्या जिह्यांमध्ये 200 पेक्षा कमी कोरोना सक्रिय रुग्ण आहेत ती न्यायालये सुरू करण्यात आल्याचे म्हटले आहे. 15 मार्च 2020 पासून न्यायालयीन कामकाज बंद करण्यात आले. मात्र, आता पुन्हा हे कामकाज सोमवारपासून सुरू होणार आहे.
न्यायालये सुरू झाली तरी प्रत्येकाचे थर्मल स्क्रिनिंग करूनच आत प्रवेश दिला जाणार आहे. कोणताही संशयित रुग्ण आढळला तर त्याला प्रवेश नाकारता येणार आहे. याचबरोबर सॅनिटायझेशन करूनच आत प्रवेश दिला जणार आहे. मास्क सक्तीचे करण्यात आले आहे. मास्क नसताना कोणीही सापडले तर त्याच्यावर कारवाई केली जाणार आहे. न्यायालये सुरू केली तरी वकील, साक्षीदार, पोलीस आणि पक्षकार यांनी सामाजिक अंतर पाळणे बंधनकारक आहे. न्यायालय परिसरातील कॅन्टीन, झेरॉक्स दुकाने, टाईपरायटर्स, नोटरी वकील यांना मुभा देण्यात येणार आहे. दोन टप्प्यांमध्ये न्यायालयाचे कामकाज होणार आहे. न्यायालये सुरू झाल्यामुळे आता वकिलांबरोबर पक्षकारांना दिलासा मिळाला आहे.