कोरोना कर्फ्यूचे नियम आणखी कडक : प्रवासी, खासगी वाहने रस्त्यावर आणण्यास प्रतिबंध: अत्यावश्यक सेवा यापुढेही सुरू
प्रतिनिधी / बेंगळूर
कोरोना नियंत्रणासाठी जारी करण्यात आलेला कोरोना कर्फ्यू अयशस्वी ठरल्याने शुक्रवारी रात्री राज्य सरकारने अखेर 14 दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला आहे. सोमवार दि. 10 मे रोजी सकाळी 6 पासून ते 24 मे रोजी सकाळी 6 पर्यंत हा लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. राज्य सरकारचे मुख्य सचिव पी. रवीकुमार यांनी यासंबंधीची नवी मार्गसूची जारी केली आहे. त्यानुसार केवळ अत्यावश्यक सेवांना सूट देण्यात आली असून खासगी वाहनांच्या वर्दळीवर प्रतिबंध घालण्यात आले आहेत.
राज्यातील कोरोनाची दुसरी लाट थोपविण्यासाठी 26 एप्रिल रोजी मार्गसूची जारी करून 12 मेपर्यंत कोरोना कर्फ्यू जारी करण्यात आला होता. मात्र, नागरिकांकडून नियम धाब्यावर बसविण्यात येत असल्याने आणि कोरोनाचा संसर्ग वाढत चालल्याने सरकारने आणखी कठोर नियम जारी करत लॉकडाऊनची घोषणा केली आहे. आरोग्य सेवा, औwषध, बांधकाम क्षेत्र, दूधविक्री, विवाह समारंभ, मालवाहतूक, रेल्वे, विमानसेवा वगळता सर्व क्षेत्रांवर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे सोमवारपासून 14 दिवस संपूर्ण राज्यात लॉकडाऊन पाळले जाणार आहे.
वाहने रस्त्यावर उतरविण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत. अत्यावश्यक वस्तू आणण्यासाठी देखील वाहनांचा वापर करू नये. त्यासाठी चालतच जावे लागणार आहे. रुग्णांना इस्पितळात नेण्यासाठी आणि घरी आणण्यासाठी खासगी वाहनांचा वापर करण्यास मुभा देण्यात आली आहे. मालवाहतुकीलाही परवानगी देण्यात आली आहे. अनावश्यकपणे वाहने घेऊन रस्त्यावर उतरणाऱयांना दंडात्मक कारवाईबरोबरच जप्तीची कारवाई केली जाणार आहे. रेल्वे, विमान प्रवासाची तिकीटे असतील तरच वाहने वापरता येणार आहेत. बस, मेट्रो रेल्वे, खासगी प्रवासी वाहनसेवा बंद ठेवण्याचा आदेश सरकारने दिला आहे. मात्र, तातडीच्या प्रसंगीच टॅक्सी, ऑटोरिक्षा रस्त्यावर आणता येतील.
भाजीपाला, फळे विक्रीसाठी मुभा असली तर सकाळी 6 ते 10 ही वेळ निश्चित करण्यात आली आहे. हातगाडीवर घरपोच भाजी-फळे विक्री, दुधाचे बूथ सायंकाळी 6 पर्यंत सुरू ठेवता येणार आहेत. कृषी, कृषी उपकरणे विक्री, दुग्धोत्पादन व संबंधित क्षेत्राला सकाळी 6 ते 10 या कालावधीपर्यंतच सूट देण्यात आली आहे. बँका, पतसंस्था सुरू राहणार आहेत. अत्यावश्यक सेवा पुरवणारी सरकारी कार्यालये सुरू राहतील. उर्वरित कार्यालयांमध्ये 50 टक्के कर्मचाऱयांचीच उपस्थिती असावी, असा आदेश देण्यात आला आहे.
धार्मिक स्थळेही बंदच
लोक एकत्र येऊन कोरोनाचा फैलाव होण्याचा धोका अधिक असल्याने मठ-मंदिरे, चर्च, मशिदींसह सर्व प्रकारची धार्मिक स्थळे बंद ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे.
बांधकामे, कारखाने सुरू, पण स्थानिक कामगारांनाच मुभा
बांधकामेही सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली असली तरी बांधकाम सुरू असणाऱया ठिकाणीच असणाऱया कर्मचाऱयांना कामे सुरू ठेवता येणार आहेत. रस्ते निर्मिती आणि दुरुस्तीकामेही सुरू ठेवता येणार आहेत. आयटी आणि आयटीइएस कंपन्यांमधील अत्यावश्यक कर्मचाऱयांनाच कंपनीत जाण्याची मुभा आहे. तर उर्वरित कर्मचाऱयांनी घरातूनच काम करावे. दूरसंपर्क, इंटरनेट सेवा, प्रसारमाध्यमे, केबल सेवा सुरू राहणार आहेत. स्थानिक कामगार व मनुष्यबळाचा वापर करून उत्पादन आधारित कारखाने सुरू ठेवता येतील. या कर्मचाऱयांना ओळखपत्राची सक्ती असणार आहे.
अधिकृत आदेशापूर्वीच वृत्तप्रसारणामुळे गोंधळ
राज्यात संपूर्ण लॉकडाऊन जारी करण्याबाबत मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी शुक्रवारी कोरोना नियंत्रणाची जबाबदारी असणारे पाच मंत्री आणि महत्त्वाच्या अधिकाऱयांची बेंगळूरमध्ये बैठक बोलावून चर्चा केली. त्यानंतर लगेच पत्रकार परिषद घेऊन त्यांनी राज्यात लॉकडाऊन अनिवार्य असल्याची प्रतिक्रिया दिली. त्यानंतर टीव्ही चॅनेल्सनी लगेच राज्यात 25 मे पर्यंत लॉकडाऊन जारी केल्याचे वृत्त प्रसारित केले. अधिकृत पत्रक जारी होण्याआधीच टीव्हीवर वृत्त प्रसारित झाल्याने नागरिकांमध्ये गोंधळ निर्माण झाला. अखेर रात्री 7.30 वाजता येडियुराप्पा आणि मुख्य सचिवांनी पत्रकार परिषद घेऊन लॉकडाऊनची घोषणा केली. मात्र, जारी केलेल्या मार्गसूचीमध्ये खासगी वाहनांची वर्दळ रोखण्यासाठी ते रस्त्यावर आणण्यावर निर्बंध घातले आहेत. परंतु कोरोना कर्फ्यू कालावधीत ज्या क्षेत्रांना सूट देण्यात आली, ती लॉकडाऊन मार्गसूचीतही कायम ठेवण्यात आली आहे.
हॉटेलमधून पार्सलला परवानगी
सकाळी 6 ते 10 पर्यंत हॉटेल, रेस्टॉरंटमधून पार्सल आणण्यास मुभा असली तरी त्यासाठी ग्राहकांना वाहनांचा वापर करता येणार नाही. पार्सल चालतच आणावे लागणार आहे. तर येथील पदार्थ होम डिलिव्हरी पद्धतीने घरपोच देण्याची मुभा असून हॉटेल कर्मचाऱयांना यासाठी वाहन वापरता येणार आहे. बार, मद्यविक्रीची दुकाने सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. मद्य दुकाने सकाळी 6 ते 10 या कालावधीतच सुरू ठेवण्यास परवानगी असणार आहे. बारमध्ये बसून मद्यप्राशन करता येणार नाही. केवळ पार्सल घेऊन जाता येणार आहे.
पूर्वपरवानगी असल्यास विवाह समारंभांना मुभा
कोरोना कर्फ्यू कालावधीत दिलेल्या परवानगीप्रमाणेच लॉकडाऊन कालावधीतही विवाह समारंभांना परवानगी देण्यात आली आहे. यामध्ये केवळ 50 जणांच्या उपस्थितीची मुभा दिली आहे. मात्र, नियम न पाळल्यास दंडासह गुन्हाही दाखल होऊ शकतो.