प्रतिनिधी /बेळगाव
शहरात येणाऱया नागरिकांना रस्त्याचे नाव आणि पत्ता शोधण्यासाठी दिशादर्शक फलक आणि ठिकठिकाणी नामफलक बसविण्यात आले आहेत. मात्र महापालिकेच्यावतीने विविध ठिकाणी बसविण्यात आलेल्या नामफलकांची दुर्दशा झाली असल्याचे निदर्शनास आले आहे. सोमवार पेठेतील रस्त्याचा विकास करताना नाफ फलक काढून चक्क गटारीवर झाकण्यात आला आहे. त्यामुळे स्मार्ट सिटीच्या अजब कारभाराबद्दल सखेद आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
बेळगाव शहर तीन राज्यांच्या सीमेवर असल्याने महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकातून नागरिक येत असतात. येणाऱया नागरिकांना रस्त्याचे नाव व पत्ता शोधताना अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे रस्त्यांची माहिती मिळण्यासाठी ठिकठिकाणी नामफलक व रस्त्याशेजारी दिशादर्शक फलक बसविण्यात आले आहेत. शहरातील चौक, प्रमुख रस्ते, उद्यान, रुग्णालय अशा विविध ठिकाणी महापालिकेच्यावतीने तिन्ही भाषेतील फलक बसविण्यात आले आहेत. पर राज्यातून येणाऱया वाहनधारकांना आणि नागरिकांना सदर फलक सोयीचे ठरत आहेत. मात्र काही ठिकाणी लावण्यात आलेले फलक खराब झालेले आहेत. तसेच स्मार्ट सिटी योजनेंतर्गत चौक आणि रस्त्याचा विकास करताना दिशादर्शक फलक हटविण्यात आले आहेत. सोमवार पेठेतील रस्त्याचा विकास करण्यात येत असून येथील नामफलक काढून बाजुला ठेवण्यात आला होता. मात्र सोमवार पेठेतील नामफलक चक्क कवळे मठासमोरील गटारीवर झाकण्यात आला आहे.
स्मार्ट सिटी कंपनीच्या अधिकाऱयांचे दुर्लक्ष
येथील रस्त्याची विकासकामे सुरू आहेत. त्यामुळे रस्त्याशेजारी असलेले नामफलक पुन्हा बसविण्याची गरज आहे. पण स्मार्ट सिटी कंपनीच्या अधिकाऱयांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे सदर फलक रस्त्याशेजारी धूळखात पडले आहेत. महापालिका प्रशासनानेदेखील याकडे कानाडोळा केला आहे. सदर फलक बनविण्यासाठी महापालिकेकडून रक्कम मोजली जाते. पण फलक जपून ठेवण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.
शहरात विविध ठिकाणी असे नामफलक बसविण्यात आले होते. पण सदर फलक गायब झाले असून नामफलक तयार करण्यासाठी खर्ची घालण्यात आलेला निधी पाण्यात गेला आहे. त्यामुळे नागरिकांतून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. विविध ठिकाणी धूळखात पडलेले नामफलक बसविण्यात यावेत, अशी मागणी होत आहे.