ज्येष्ठ समाजसेविका अपर्णा रामतीर्थकर यांचे निधन
सोलापूर / प्रतिनिधी
ज्येष्ठ समाजसेविका आणि हिंदुत्ववादी कार्यकर्त्या अपर्णा अरुण रामतीर्थकर यांचे मंगळवारी दुपारी पावणेबाराच्या सुमारास सोलापुरातील खासगी हॉस्पिटलमध्ये निधन झाले.
पक्षघातामुळे गेल्या महिन्यात गुढी पाडव्यादिवशी त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. अपर्णा रामतीर्थकर या ज्येष्ठ पत्रकार अरुण रामतीर्थकर यांच्या पत्नी होत्या. सोलापुरातील पाखर संकुल या अनाथ मुलांच्या वसतिगृहाच्या उभारणीत त्यांचा सहभाग होता. संस्कार भारतीच्या माध्यमातून त्यांनी सोलापुरात काम केले. तसेच बेरोजगार महिलांना रोजगार मिळावा यासाठी स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करुन दिल्या. त्यांनी विवाहानंतर संसार सांभाळत 1996 मध्ये बी. ए. ची पदवी मिळविली. त्यानंतर एलएलबीचे शिक्षण पूर्ण केले. सोलापुरातील जिल्हा न्यायालयात त्यांनी वकिलीही केली. विशेषतः पती-पत्नी यांच्यातील तंटे समेटाने मिटविण्याची त्यांची भूमिका होती. कौटुंबीक वाद आपापसात मिटवावेत यासाठी त्यांनी प्रयत्न केले.
पती-पत्नी यांच्यातील नाते, घटस्फोट, पतीच्या चुका, पlनीच्या चुका, सासूच्या उणिवा इत्यादी विषयावर त्यांनी व्याख्यानाच्या माध्यमातून परखडपणे विचार मांडले. कुटुंब एकसंघ कसे राहिल याविषयी त्यांनी प्रबोधन केले. संपूर्ण महाराष्ट्रात हजारो व्याख्याने देऊन त्यांनी कौटुंबीक प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला. बेळगावस्थित तरुण भारतच्या दिवाळी अंकाचे प्रकाशन करण्यासाठी अपर्णा रामतीर्थकर या दोन वर्षांपूर्वी सोलापुरातील तरुण भारत संवादच्या कार्यालयात आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी सोलापुरात नव्याने सुरु झालेल्या तरुण भारत संवादचे स्वागत केले होते. त्यांच्या पश्चात आई, मुलगा आशुतोष, सून रश्मी आणि नात असा परिवार आहे.