कर्नाटक सरकारच्या हिजाब बंदी विरोधात एमआयमचे आंदोलन
कर्नाटक सरकारने राज्यातील सरकारी शाळांमध्ये मुस्लीम समाजाच्या विद्यार्थिनींना हिजाब बंदी केली आहे. या निर्णयाचे पडसाद संपूर्ण भारतभर उमटले आहेत. याच पार्श्वभूमीवर सोलापुरात शहर-जिल्हाध्यक्ष फारूक शाब्दी यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयएम पक्षाने या निर्णयाच्या निषेधार्थ महिला शहरध्यक्षा सलमा सय्यद यांच्या नेतृत्वाखालील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून कर्नाटक सरकार आणि भारतीय जनता पक्षाचा निषेध नोंदविण्यात आला. यावेळी एक नारी सब पे भारी, नारे तकबीर अल्लाहू अकबर या घोषणांनी परिसर दणाणून गेला.
कर्नाटकमधील भारतीय जनता पक्षाचे सरकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाच्या विरोधात काम करत आहे. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी बेटी बचाव, बेटी पढावचा नारा देतात. मात्र दुसरीकडे त्याच मुलींना शिकू दिले जात नाही. आम्ही ‘हिजाब’मध्ये सुरक्षित आहोत, मग हा निर्णय का? जाणीवपूर्वक मुस्लिम समाजाला लक्ष्य केले जात असल्याचा आरोप सलमा सय्यद यांनी यावेळी केला.
या आंदोलनात ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे नगरसेवक गाजी जहागीरदार, अजहर हुंडेकरी, वहिदा भंडाले, एमआयएम वाहतूक जिल्हाध्यक्ष रियाज सय्यद, रेश्मा मुल्ला, मोसिन मैंदर्गीकर, सलमा सय्यद, नसीमा कुरैशी, नसिम खलीफा, हारिश कुरैशी, अखलाख दिना, एजाज बागवान, इक्बाल पठाण, इस्लामोद्दीन शेख, मोहसीन नदाफ, वसीम देशमुख, दौला नदाफ, वसीम शेख, रिझवान हवालदार, रिझवान कुरैशी, जुबेर बसरी आदींनी सहभाग नोंदविला होता. दरम्यान, आंदोलन असल्यामुळे सकाळपासूनच पूनम गेटवर चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. आंदोलनानंतर निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांना निवेदन देण्यात आले. आंदोलन संपल्यावर पोलिसांनी सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
कर्नाटकच्या मुस्कानला शाब्दी यांच्याकडून एक लाखांची मदत जाहीर
उडपी येथील महाविद्यालयात हिजाबचा विरोध असताना मुस्कान खान या विद्यार्थिनीने हिजाब घालून विद्यालयात प्रवेश करून जी हिंमत दाखवली आहे त्या हिमतीला सलाम करत त्या विद्यार्थिनीच्या पुढील शिक्षणासाठी एमआयएम शहराध्यक्ष फारूक शाब्दी यांच्यातर्फे एक लाख रुपये मदत म्हणून देण्यात येणार आहे.
माकपच्या वतीने आज निषेध आंदोलन
कर्नाटक राज्यात हिजाबच्या नावे मुस्लीम विद्यार्थिनींवर अन्याय करणाऱया कर्नाटक शासनाचा कडक निषेध करणारे पत्रक भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) राज्य समितीच्या वतीने ज्ये÷ नेते माजी आमदार कॉ. नरसय्या आडम मास्तर यांनी दिले आहे.
महाराष्ट्रातील तरुणांची मने दूषित करणाऱयांच्या कारवाया शिवाजी महाराज, म. फुले, शाहू महाराज, महर्षी वि. रा. शिंदे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिसिंह नाना पाटील यांचा महाराष्ट्र कदापि खपवून घेणार नाही, अशा आशयाचे पत्रक काढले असून गुरुवार, दि. 10 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, पूनम गेट येथे धर्मांध ध्रुवीकरणाच्या विरोधात तीव्र निदर्शने करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.