बंडगार्डन विसर्ग १८,२२१, दौंड विसर्ग २९,२८९ क्युसेक दोन दिवसांत १४ टक्के वाढ
वार्ताहर / बेंबळे
मागील आठवड्यापासून पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक उजनीत होत आहे. दरम्यान पुणे, सोलापूर, अहमदनगर या तीन जिल्ह्यांसाठी वरदायिनी असलेल्या उजनी धरणात झपाट्याने वाढ होत आहे. गुरूवार दि. १४ रोजी ३२.२९ टक्के असणारा उपयुक्त पाणीसाठा रविवार दि. १६ रोजी ४६ टक्के झाला आहे. गेल्या दोन दिवसांत पाणीसाठ्यात १४ टक्क्यांनी वधारला. तर एकूण पाणीसाठ्यात ९ टीएमसी ने वाढ होवून पाणीसाठा ८८ टीएमसी झाला आहे.
पुणे जिल्ह्यात होणाऱ्या धुवांधार पावसामुळे कलमोडी, आंध्रा, कासारसाई आणि खडकवासला ही धरणे १०० टक्के भरली आहेत. तसेच बाकी धरणांची पाणी पातळी समाधानकारक असल्याने या धरणांमधून मोठा विसर्ग भिमा व भिमेच्या उपनद्यांमध्ये होत आहे. यामुळे बंडगार्डनमधून १८ हजार २२१ चा विसर्ग उजनीत होत आहे, भिंमाशंकर येथे होत असलेल्या पावसामुळे घोड व इंद्रायनी दुथडी भरुन वाहत असल्याने दौंडमधून २९ हजार २८९ क्युसेकचा विसर्ग उजनीत येत आहे. दरम्यान बंडगार्डन व दौंडमधून येणाऱ्या मोठ्या विसर्गामुळे उजनीच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ होत आहे. उजनी धरणात लक्षणिय वाढ पाहता अॉगस्ट अखेर धरण शंभरी ओलांडल्याची चिन्हे दिसू लागल्याने लाभक्षेत्रातील बळीराजा सुखावला आहे.
गुंजवणी, वीर व नाझरे मधून निरेत विसर्ग …
वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये नीरा खोऱ्यात असलेली भाटघर, नीरा देवधर, गुंजवणी ही सर्व धरणे गेल्या आठवडयापासुन पडत असलेल्या दमदार पावसामुळे भरण्याच्या मार्गावर आहेत तर वीर धरण १०० टक्के भरले आहे. वीरमधून निरेत १३ हजार १६४ क्युसेकचा विसर्ग निरापात्रात होत आहे. तर गुंजवणीमधुन २ हजार १५२ क्युसेकचा विसर्ग होत आहे. नाझरे धरण शनिवारी (दि. १५) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास पूर्ण क्षमतेने भरल्याने या धरणातून कऱ्हा नदी पात्रात १ हजार ७६० क्युसेकने विसर्ग सुरू आहे. धरणास एकूण २६ स्वयंचलित दरवाजे असून त्यापैकी दोन दरवाजातून जास्तीचा प्रवाह सुरू आहे तर इतर दरवाजावरून पाणी वाहत आहे.
दरम्यान निरापात्रातील सर्वच धरणांमधून विसर्ग सुरू असल्याने निरा नदी दुथडी भरून वाहत आहे. निरा-भिमा संगमाजवळ नरसिंगपूर येथे भिमा नदीत ३५ हजार क्युसेकचा विसर्ग तयार झाला आहे. निरेचे पाणी भिमानदीत मिळाल्याने भिमा नदीसुध्दा दुथडी भरून वाहू लागली आहे. पंढरपूर येथे चंद्रभागेत १७ हजार २६५ क्युसेकचा विसर्ग होत आहे. निरा खोऱ्यातील सर्वच धरणे भरल्यामुळे या विसर्गात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दि. १६/०८/२०२० उजनी धरणातील पाणीपातळी सायं. ६ वा.
एकूण पाणीपातळी – ४९४.०९५ मीटर
एकुण पाणीसाठा – ८८.३७ टी.एम.सी
उपयुक्त साठा – २४.७१ टी.एम.सी.
टक्केवारी – ४६.१३ टक्के
दौंड – २९,२८९ क्युसेक
बंडगार्डन – १८,२२१ क्युसेक
विसर्ग
वीरमधून निरेत विसर्ग – १३,१६४ क्युसेक
नरसिंगपूर (संगम) विसर्ग – ३५,२९७ क्युसेक
पंढरपूर विसर्ग – १७,२६५ क्युसेक
Next Article पुणे विभागात 1 लाख 14 हजार 681 रुग्ण कोरोनामुक्त
Abhijeet Khandekar
Meet Abhijeet Khandekar : a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. With a Master's degree in Journalism from Shivaji University, Abhijeet specializes in political news, entertainment, and local content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives. Connect with Abhijeet for collaborations and captivating content that informs and entertains.