मोहोळ / तरुण भारत संवाद प्रतिनिधी :
सोलापूर जिल्ह्यातील गाळप हंगाम सुरू होऊन दीड महिना लोटून गेला तरीही ऊस दराची कोंडी फोडली जात नाही. यासाठी महाराष्ट्राच्या साखर आयुक्त यांच्या कार्यालयाबाहेर मोहोळ तालुक्यातील शिवसेनेचे नेते नागेश वनकळसे यांनी लाक्षणिक आंदोलन सुरू केले.
मागील दहा दिवसांपूर्वी नागेश वनकळसे याना ऊस दराची कोंडी फोडावी, यासाठी साखर आयुक्तांकडे निवेदन दिले होते व धरणे आंदोलन केले जाईल असा इशारा दिला होता. दीड महिन्याचा कालावधी लोटून गेला तरी ऊसाचा दर कारखान्यानी जाहीर केलेला नाही हे अतिशय दुर्दैवी आहे. जवळपास ६० लाख मेट्रिक टन ऊस गाळप केला जातो परंतु ऊस दर जाहीर केला नाही.
पश्चिम महाराष्ट्रातील सांगली,सातारा ,कोल्हापूर, पुणे या जिल्ह्यातील साखर कारखाने ऊसाला एफआर पी नुसार चांगला भाव देत आहेत. परंतु सोलापूर जिल्ह्यातील कारखानदार ऊस गाळपास नेत आहेत, परंतु दर जाहीर करीत नाहीत हे दुःखद आहे. त्यांच्या संवेदना जाग्या व्हाव्यात व आयुक्तांनी यात हस्तक्षेप करावा म्हणून हे आंदोलन करण्यात येत असल्याचे वनकळसे यांनी सांगितले.
तसेच अन्य मागण्याही कारखान्यांनी महसुली उत्पन्नाच्या ७० टक्के रक्कम शेतकऱ्यांना अदा करावी. १४ दिवसात ऊस गेल्यानंतर ऊस बिल द्यावे कारखान्याच्या रिकव्हरी तपासणीसाठी शासकीय प्रतिनिधी नेमावेत जिल्ह्यातील बरेच कारखाने कामगारांचे वेतन थकवीत आहेत ते तात्काळ द्यावे शेतकऱ्यांची गेल्या दोन वर्षांपासूनची ऊस बिले द्यावीत आणि साखर कारखान्याचे ऊस वजन काटे ऑनलाइन करावेत यासाठी धरणे आंदोलन केले. यावेळी शिवसेनेचे तालुका प्रमुख अशोक भोसले ,उपतालुका प्रमुख बाळासाहेब वाघमोडे, हर्षल देशमुख ,अभिजित भोसले,गणेश लाखदिवे,प्रीतम सुतार यासह शिवसैनिक उपस्थित होते.