तरुण भारत संवाद प्रतिनिधी/कुर्डुवाडी
कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता शहरात तीन दिवसाचा जनता कर्फ्युचे आवाहन नगराध्यक्ष समीर मुलाणी यांनी केले आहे. शहरांमध्ये गुरूवारी दि.१४ ते शनिवार दि.१६ पर्यंत तीन दिवस औषध दुकाने,दवाखाना सोडून इतर सर्व व्यवहार बंद राहणार आहेत. दुध विक्रीसाठी ७ ते ९ ही वेळ देण्यात आली आहे. या कालावधीत इतर सर्व दुकाने बंद राहणार असून शहराला जोडणारे सर्व उप रस्ते बंद करण्यात येणार आहेत.
या कालावधीत शहरातील व बाहेरील नागरिकांनी दवाखाने व मेडीकल सोडून इतर कारणासाठी बाहेर पडल्यास कारवाई केली जाणार आहे. शहरातील व्यापारी खरेदीसाठी सोलापुर, पुणे,मुंबई अशा ठिकाणी गेल्याचे निदर्शनास आल्यास कारवाई केली जाणार आहे.शहरामध्ये बाहेरून येणाऱ्या व जाणाऱ्या प्रत्येक वाहनाची तपासणी केली जाणार असून त्यामध्ये निष्काळजीपणा आढळून आल्यास कारवाई केली जाणार आहे. तरी जनता कर्फ्यूच्या कालावधीत कोणत्याही नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन नगराध्यक्ष समीर मुलाणी यांनी केले आहे.
रविवार पासून ग्रामीण भागातील नागरिकांना शहरात येण्यासाठी ठराविक वेळ दिली जाणार आहे. या कालावधीतच त्यांना शहरात प्रवेश दिला जाणार आहे. यासाठी शहरातील मुख्य रस्ते बंद ठेवण्यात येणार असून शहरातील एन.सी.सीचे विद्यार्थीचे सहकार्य यासाठी घेण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील नागरिकांनीही सहकार्य करून ठरवून दिलेल्या वेळेतच शहरात यावे .तसेच तीन दिवसाच्या जनताकर्फ्यू नंतर दुकाने उघडल्यानंतर व्यापाऱ्यांनी व नागरिकांनी मास्क वापरणे बंधनकारक अहे.