कुर्डुवाडी / तरुण भारत संवाद प्रतिनिधी
कुर्डुवाडी ते भिगवण दरम्यान विद्यत रेल्वे सुरु करण्यासाठी २०१९ पासून कुर्डुवाडी ते भिगवण दरम्यान विद्युतीकरणाच्या कामास प्रारंभ झाला होता. गुरूवारी दि.१२ रोजी या झालेल्या रेल्वे विद्युतीकरणाची सुरक्षितता तपासणी रेल्वे सुरक्षा आयुक्त व त्यांच्या पथकाने केली असून विद्युतीकरणाचा हा पहिला टप्पा यशस्वीरीत्या पूर्ण झाला असून या मार्गावरून रेल्वे धावण्यासाठी हिरवा कंदिल मिळाला आहे.
रेल्वे सुरक्षा आयुक्त ए. के. जैन, सोलापूर विभागीय व्यवस्थापक शैलेश गुप्ता, वरिष्ठ विभागीय उपव्यवस्थापक प्रवीण वंजारी यांच्यासह विद्युत विभागातील अधिकारी आदींनी चाचणी केली. प्रारंभी कुर्डुवाडी रेल्वे स्थानकावर या विद्युतीकरणाच्या कामाचे विधिवत पूजन करण्यात आले ही व्यवस्था रेल विकास निगम लिमिटेडने केली होती. स्थानक परिसरात शामियाने उभा करुन जय्यत तयारी करण्यात आली होती.
विशेष ८ डब्यांच्या गाडीने गेलेल्या पथकाने भिगवण ते कुर्डूवाडी अशा परतीच्या मार्गावर तासी ११० च्या वेगाची यशस्वी चाचणी घेतली. विद्युतीकरणामूळे रेल्वेच्या महसुलात २० टक्के बचत होणार आहे. दुहेरीकरणाबरोबरच विद्युतीकरणही पूर्ण झाल्याने आणखी नव्याने गाड्या सुरू होऊ शकतात. प्रवासात वेळेची बचत होणार आहे.
लवकरच विजेवरील इंजिन सोलापूर विभागात दाखल होणार असून विजेवर चालणाऱ्या गाड्यांसाठी सोलापूर विभागातील मेल आणि पॅसेंजरसाठी प्रत्येकी १० तर मालगाडीच्या ६ चालक अशा २६ चालकांना भुसावळ व दौंड येथे प्रशिक्षण देण्यात आल्याची माहिती रेल्वे सूत्रांनी दिली. ही विशेष गाडीसाठी मेल एक्सप्रेस लोकोपायलट आर एस भंडारे,सहा.लोकोपायलट संदीप कुमार यांनी पायलट म्हणून काम पाहिले.यांच्यासमवेत सी एल आय विष्णू दुबे हे उपस्थित होते.