तरुण भारत संवाद प्रतिनिधी / कुर्डुवाडी
माढा तालुक्यात कोरोनाचा उद्रेक झाला असून एकट्या कुर्डुवाडी शहरात १३० जण कोरोनाबाधित असून आजपर्यंत ३१ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. कुर्डुवाडी हे कोरोनाचे हॉटस्पॉट झाले आहे. शहरात बाधितांची संख्या वरचेवर वाढत आहे. हॉस्पीटल, क्वॉरंटाइन सेंटरमध्ये जागा उपलब्ध नाही. अशा परिस्थितीत होम आयसोलेशनमध्ये असलेल्या बाधितांचा शहरात मुक्त संचार होत असल्याचे दिसून येत आहे. प्रशासनमात्र कागदोपत्री घोडे नाचवून सर्व काही अलबेल असल्याचे सांगत आहे.
आज शहर व परिसरात जे बाधित आढळले आहेत. जे होम आयसोलेशनमध्ये आहेत त्यांच्यावर प्रशासनातील कोणाचेच नियंत्रण नाही. घरी आयसोलेशनमध्ये जे उपचार घेत आहेत.ते घरी आहेत का की आपला व्यवसाय करत बसलेत किंवा सार्वजनिक ठिकाणी वावरत आहेत याची प्रशासनाने नोंद घेणे आवश्यक आहे परंतू असे होताना दिसत नाही. सध्या परिसर कन्टेन्मेंट झोन घोषित करणे बंद झाले आहे. परिसारत फलक लावणे बंद झाले आहे. शेजाऱ्यांनाही याची माहिती नसते त्यामुळे हे बाधित रुग्ण अनेकवेळा सार्वजनिक ठिकाणी वावरताना दिसतात. यामुळे धोका अधिक बळावण्याची दाट शक्यता आहे. त्यासाठी प्रशासनाने फक्त कागदोपत्री सोपस्कार करुन चालणार नाही तर या लोकांवर निरिक्षण व वचक सुद्धा असणे आवश्यक आहे.
असे हे बेजबाबदार लोक स्वतः बरोबर इतरांच्या आरोग्यास धोका निर्माण करु शकतात हे समाजात सुपरस्प्रेडर म्हणून वावरत असतात अशा बेजबाबदार लोकांवर कारवाई होणे अपेक्षित आहे. अशा बेजबाबदार लोकांमुळे इतरांवर अन्याय होतो . नाहक इतरांना याचा त्रास व मनस्ताप सहन करावा लागतो प्रशासनाने अशा लोकांवर कडक कारवाई केली पाहिजे व त्यांना दिलेली होम आयसोलेशनची परवानगी नाकारुन कोविड केअर सेंटर मध्ये दाखल केले पाहिजे अशी नागरिकांची मागणी आहे.