सोलापूर / प्रतिनिधी
सोरेगाव परिसरातील अतिक्रमण काढण्याच्या गुन्ह्यात तसेच दरोड्याच्या गुन्ह्यात सहभागी असलेले दोन्ही पोलीस निलंबित करण्यात आले आहे. पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी बुधवारी रात्री आदेश काढला. या घटनेमुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे.
दरोड्याच्या गुन्ह्यात सहभाग असलेल्या पोलिसांना ताब्यात घेऊन अटकेची प्रक्रिया करीत असताना विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या परिसरातून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पोलीस नाईक कीर्तिराज आडगळे हा गुरुवारी सायंकाळी पळून गेला. तर पोलीस हवालदार जयप्रकाश कांबळे यास अटक करण्यात आली होती. न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती.
विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोरेगाव परिसरात कलशेट्टी व शहरातील बडे व्यवसायिक रेड्डी यांच्या जमिनी आहेत. या दोघांमध्ये जमिनीवरून वाद आहे. कलशेट्टी यांनी रेड्डी यांच्या शेतात अतिक्रमण केले आहे. जमीन अतिक्रमण मुक्त करण्यासाठी पोलीस नाईक कीर्तिराज आडगळे व पोलीस हवालदार जयप्रकाश कांबळे यांनी रेड्डी यांचे मॅनेजर चुंगे यांच्याशी संधान साधत पुढील रुपरेषा ठरवून घेतली.
दरम्यान लॉकडाऊनच्या काळात सगळे कांबळे यांनी इतर साथीदारांच्या मदतीने अतिक्रमण काढले. परंतु कलशेट्टी यांच्या शेतकऱ्यास दमदाटी करून त्यांच्याकडील मोबाईल बळजबरीने काढून घेण्यात आला होता. याप्रकरणी कलशेट्टी यांनी दिलेल्या तक्रारीवरून विजापूर नाका पोलीस ठाण्यात 25 मार्च रोजी पोलीस नाईक आडगळे, पोलीस हवालदार कांबळे, चुंगी, रेड्डी यांच्यासह आठ जणांविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याच्या तपासात मध्ये पोलीस नाईक आडगळे तसेच पोलीस हवालदार कांबळे हे घटनेच्या वेळी त्या ठिकाणी हजर असल्याचे सिद्ध झाले. यावरून त्यांना गुरुवारी सायंकाळी ताब्यात घेण्यात आले होते. पोलीस ठाण्यात आणून त्यांच्यावर अटकेची प्रक्रिया करीत असताना पोलीस नाईक आडगळे हा पोलिसांच्या कायदेशीर रखवालीतून पळून गेला आहे. पोलीस त्याच्या शोधात आहे. दरम्यान बुधवारी रात्री पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी कांबळे आणि आडगळे या दोघांना सेवेतून निलंबित केले असल्याचा आदेश काढला. त्यामुळे शहर पोलिस दलात खळबळ उडाली आहे.