आरोपी उमेश गलांडे याची जामीनावर मुक्तता
प्रतिनिधी / करमाळा
करमाळा तालुक्यातील चिखलठाण येथील अजित गलांडे खून प्रकरणी आरोपी उमेश गलांडे याची जामीनावर मुक्तता करण्यात आलेली आहे.
करमाळा तालुक्यातील चिखलठाण येथे दि. ११ जुलै २०२० रोजी मयत अजित नवनाथ गलांडे याचा खून झालेला होता. सदरील घटनेत त्याचे वडील नवनाथ गलांडे यांनी उमेश राजाराम गलांडे, राजाराम बलभीम गलांडे, संतोष राजाराम गलांडे व इतर दोन विरुद्ध यांच्या वर करमाळा पोलिस स्टेशन येथे रितसर फिर्याद दिलेली होती. सदर फिर्यादी मध्ये मिथुन गलांडे व मयत अजित गलांडे हे दोघे ११ जुलै रोजी सकाळी ७:३० वाजल्याच्या सुमारास चिखलठाण येथे गलांडे मळयाजवळ मासेमारी करत असताना त्यांच्यात व उमेश राजाराम गलांडे व इतर यांच्यात मासेमारी करण्याच्या जागेवरून भांडण झाले त्यात उमेश राजाराम गलांडे व इतर यांनी डोक्यात व छाती वर काठयाने मारून त्यांचा खून केला. तसेच मिथुन गलांडे यास गंभीर जखमी केल्या बाबत फिर्याद दाखल होती.
तदनंतर उमेश राजाराम गलांडे, संतोष राजाराम गलांडे, राजाराम बलभीम गलांडे यांना अटक करण्यात आली. उमेश गलांडे यांनी ॲड. निखिल पाटील यांचे मार्फत जामीनसाठी जिल्हा व सत्र न्यायालय बार्शी येथे धाव घेतली.
सदर अर्जाचे सुनावणी वेळी आरोपींचे वतीने ॲड. निखिल पाटील यांनी सदर गुन्ह्याचा तपास पूर्ण झाला असून चार्जशिट दाखल झालेले आहे व खटला मे. कोर्टात प्रलंबित आहे. तसेच खटला चालण्यास बराच अवधी लागणार असून यातील आरोपी नं.२ व ३ यांना या पूर्वीच जामिन मंजूर झालेला आहे त्याच तत्वावर सदरील उमेश राजाराम गलांडे यास जामीन मंजूर करण्यात यावा असा युक्तीवाद करण्यात आला.
सदर युक्तिवाद ग्राह्य धरून मा. जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एस. पाटील यांनी आरोपी उमेश राजाराम गलांडे यांची ३० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीनावर मुक्तता केली.
सदर प्रकरणात आरोपी तर्फे ॲड. निखिल पाटील, ॲड. विक्रम सातव, ॲड. दत्तप्रसाद मंजरतकर तर मूळ फिर्यादी तर्फे ॲड. धनंजय माने यांनी तर सरकार तर्फे ॲड. डी.डी. देशमुख यांनी काम पाहिले.