नागरिकांना बाहेर न पडण्याचे निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
मदतीसाठी टोल फ्री क्रमांक जारी
तरूण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
हवामान विभागाने शहर आणि जिल्ह्याच्या परिसरात येत्या शनिवार १७ ऑक्टोबरपर्यत अतिवृष्टी होण्याचा इशारा दिला असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने अतिवृष्टी होणाऱ्या संभाव्य भागातील नागरिकांना धोक्याचा इशारा दिला आहे. अतिवृष्टी झाल्यास नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले असून, आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
जिल्ह्यात पहाटेपासून मुसळधार पाऊसाला सुरूवात झाली. जिल्हा आणि शहर आपत्ती व्यवस्थापन विभागांनी याबाबत दक्षता घेऊन उपाययोजना करण्याचे आदेश निवासी उपजिल्हाधिकारी श्री अजित देशमुख यांनी दिले आहेत. जीवित आणि वित्तहानी टाळण्यासाठी शोध आणि बचाव पथके; तसेच साहित्य यांची व्यवस्था करावी, आपत्ती व्यवस्थापन विभागांनी सर्व कर्मचारी उपलब्ध ठेवावेत, दुर्घटना घडल्यास तातडीने बचाव कार्य करावे, जुन्या आणि मोडकळीस आलेल्या इमारती आणि पूल या ठिकाणची वाहतूक वळवावी किंवा तात्पुरती थांबविण्यात यावी, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. ‘दामिनी लाइटनिंग अलर्ट’ अॅप डाउनलोड करा ‘वीज पडणाची शक्यता असलेल्या ठिकाणांची आगाऊ माहिती मिळण्यासाठी नागरिकांनी ‘दामिनी लाइटनिंग अलर्ट’ हे अप डाउनलोड करावे; तसेच आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी *०२१७-२७३१०१२* किंवा *१०७७* या टोल फ्री क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन अजित देशमुख यांनी केले आहे.