सोलापूर-बार्शी रोडचे कामावर राळेरास जवळ घटना !
तरुण भारत संवाद प्रतिनिधी / वैराग
टाटा हायवा दहाचाकी टिपर अंगावरून गेल्याने १९ वर्षीय मजुराचा दुर्देवी मृत्यू झाला. शुभम बळीराम सुर्वे (रा. गावडी दारफळ ता. उत्तर सोलापूर) असे हा अपघातात मयत झालेल्याचे नाव आहे. या अपघाताची वैराग पोलिसांत नोंद झाली असून टीपर चालकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
वैराग पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, सोलापूर-बार्शी रोडचे काम मंगळवेढा येथील एस. एम. आवताडे आणि कंपनीने घेतले आहे. या कामावर गावडी दारफळ येथील मजूर काम करतात. महेश परबत व त्याचा मित्र शुभम सुर्वे असे दोघे रात्रपाळीने काम करीत होते. राळेरास ते शेळगावमध्ये राळेरासपासून दिड किलोमीटर अंतरावर असलेल्या कामावर हे काम सुरू होते. टिपरला साईड दाखवणे व मुरूम खाली करून घेण्याचे काम हे दोघे करीत होते.
पहाटे साडेतीनच्या दरम्यान मुरूम भरून आलेला टाटा हायवा दहा चाकी टिपर (MH- १३,DQ ४O२) चा चालक मागे रिव्हर्स घेत होता. ड्रायव्हर बाजूस महेश परबत होता बाजूस शुभम सुर्वे होता. त्यावेळी टिपरचालकाने मुरुमाचा ढिगारा पडला आहे. तु टिपर पाठीमागे घेऊ नको, असे ओरडून व बॅटरीने खुनवून ही त्याने हयगयीने व निष्काळजीपणाने टिपर मागे घेत गेल्याने साईड दाखविणारा शुभम चाकाखाली सापडला. डाव्या साईडचे पाठीमागील चाक छातीवरून व डोक्यावरून गेल्याने शुभमचा जागीच मृत्यू झाला. टिपर चालक दुराव रामचित चंद (बिहार) याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. प्रेताचे शवविच्छेदन वैराग येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात झाले. टिपरचालकास पोलीसांनी ताब्यात घेतले असून घटनेचा पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल शिवाजी व्हळे हे करीत आहेत.