तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
शेतकऱ्यांचा आंदोलन दडपून टाकण्यासाठी केंद्र सरकार पोलीस बळाचा वापर करत आहे. शेतकऱ्यांवर लाठी हल्ला, अश्रूदूर, पाण्याचा मारा, अटक सत्र करून आंदोलन चिघळण्याचा प्रयत्न चालू आहे. परंतु देशाच्या कृषी प्रधान राज्यातून शेतकऱ्यांचे जथ्थेच्या जथ्थे दिल्लीत दाखल होत आहेत. याचा अर्थ शेतकरी आता माघार घेणार नाही. या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला संबंध देशभरातून कामगार व शेतकरी उत्स्फूर्त पाठींबा देत आंदोलनाच्या पवित्र्यात उतरलेले आहेत. शेतकरी-कामगार विरोधी कायदे रद्द न केल्यास आंदोलन आणखीन तीव्र करण्याचा इशारा संत तुकाराम चौक येथे झालेल्या रास्तारोकोच्या वेळी माजी आमदार कॉ. नरसय्या आडम (मास्तर) यांनी सरकारला दिला.
गुरुवार दि. ३ डिसेंबर २०२० रोजी अखिल भारतीय किसान सभा आणि अन्य शेतकरी संघटनेच्या वतीने दिल्ली येथे होत असलेल्या शेतकऱ्यांच्या दडपशाही विरोधात आणि शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ देशव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आली. त्या अनुषंगाने सोलापुरात माजी आमदार कॉ. नरसय्या आडम (मास्तर) आणि सिटूचे राज्य महासचिव अड. एम.एच.शेख यांच्या नेतृत्वाखाली सकाळी ११ वाजता गेंटयाल चौक (संत तुकाराम चौक) येथे रास्तारोको करण्यात आला.
सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स, अखिल भारतीय जनवादी महिला संघटना, भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघ, एस.एफ.आय. तसेच सिटू प्रणीत अन्य संघटीत-असंघटीत कामगार संघटनांचे प्रतिनिधी कार्यकर्ते शेतकऱ्यांच्या आंदोलनास पाठींबा देण्यासाठी रास्तारोकोचा निर्धार केला. त्या अनुषंगाने सकाळी १० वाजल्यापासून संत तुकाराम चौक, अशोक चौक, गेंटयाल चौक, वडार गल्ली, बापुजी नगर या परिसरात कार्यकर्ते जमले, या दरम्यान पोलीस प्रशासनाचा फौजफाटा तैनात झाला, कार्यकर्त्यांचा कानोसा घेण्याचा प्रयत्न पोलिसांमार्फत चालू होता. अचानक ११.२० वाजता कॉ. आडम मास्तर गेंटयाल चौक येथे गाडीतून उतरताच गुप्तपणे जमलेले सर्व कार्यकर्ते चारही रस्ते नाकाबंदी करून जोरदार घोषणाबाजी सुरु केले. यावेळी बनर, फलक, झेंडे घेऊन महिला, विद्यार्थी, युवक आणि कामगार रखरखत्या उन्हात रस्त्यावर बसले. पोलिसांची प्रचंड दडपशाही चालू होता. तरीही कार्यकर्ते रस्त्यावरून उठले नाहीत. अखेर पोलिसांना बळाचा वापर करून ताब्यात घ्यावे लागले. यावेळी कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यात चांगलीच झटापट झाली.
यावेळी पुढे बोलताना कॉ. आडम मास्तर म्हणाले कि, सरकारने शेतकऱ्यांच्या विरोधात युद्ध पुकारलेले असून भांडवलदारांना जगविण्यासाठी शेतकऱ्यांची फसवणूक मोदी सरकार करीत आहे. शेतकऱ्यांच्या शेती मालाला हमीभाव देवू न शकणारे सरकार साठेबाजी आणि महागाईला प्रोत्साहन देत आहे. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करा हि मागणी घेऊन शेतकरी वर्षानुवर्षे टाहो फोडत आहेत. पण सरकार कदापि ते मान्य करायला तयार नाही.
यावेळी सिटूचे राज्य महासचिव कॉ. एम.एच.शेख यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला महाराष्ट्रातील संपूर्ण कामगार, कष्टकरी, शेतकरी आणि शेतमजुरांचा पाठींबा असून शेतकऱ्यांचा आवाज दडपून टाकू शकत नाही. तसे झाल्यास हि लढाई अखंड चालू राहील. असे प्रतिपादन केले.
यावेळी नगरसेविका कॉ. कामिनिताई आडम, माजी नगरसेविका नसीमा शेख, नलिनीताई कलबुर्गी, व्यंकटेश कोंगारी, युसुफ शेख (मेजर), म.हनीफ सातखेड, सलीम मुल्ला, मुरलीधर सुंचू, विक्रम कलबुर्गी, अनिल वासम आदि उपस्थित होते.
सदर रास्तारोको आंदोलन यशस्वी करण्यासाठी विजय हरसुरे, माशप्पा विटे, विल्यम ससाणे, दाउद शेख, नरेश दुगाणे, जावेद सगरी, किशोर मेहता, बाबू कोकणे, शहाबोद्दिन शेख, लिंगव्वा सोलापुरे, शकुंतला पाणीभाते, मोहन कोक्कुल, वीरेंद्र पद्मा, बाळकृष्ण मल्याळ, बापू साबळे, अप्पाशा चांगले, वासिम मुल्ला, इलियास सिद्धिकी, असिफ पठाण, दीपक निकंबे, सनी शेट्टी, अमित मंचले, श्रीकांत कांबळे, राजू गेंटयाल, अंबादास बिंगी, प्रवीण आडम, डेव्हिड शेट्टी, बालाजी गुंडे, श्रीनिवास तंगडगी, राम मरेड्डी, किशोर गुंडला, दत्ता चव्हाण, मलेशम्म कारमपुरी, शाम आडम, मधुकर चिल्लाळ, नरेश दुगाणे, मल्लिकार्जुन बेलीयार, भूमेश अदेली, अभिजित निकंबे, नागेश म्हेत्रे, रवि गेंटयाल, संजय ओंकार, दत्तोबा साखरे, योगेश अकिम, अमोल काशीद, राजेश काशीद, रफिक काझी, लक्ष्मण जोरीगल, भारत दिलपाके आदींसह शेकडो कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.