तरूण भारत संवाद प्रतिनिधी / अक्कलकोट
राज्यातील मदिरालये उघडी करणाऱ्या सरकारने देवालये उघडी करावी ही मागणी करत मंगळवारी अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ मंदिरासमोर भारतीय जनता पार्टीच्यावतीने भजन आंदोलन करण्यात आले. सकाळी 11 वाजता सदरचे भजन आंदोलन पार पडले. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हे भजन आंदोलन करण्यात आले.
यावेळी भाजपा पदाधिकाऱ्यांनी राज्य सरकारच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी केली. तसेच राज्यातील सर्व मंदिरे उघडण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. याप्रसंगी बोलताना सचिन कल्याणशेट्टी यांनी राज्यातील मदिरालये सरकारने उघडी केली आहेत. आता देवालये सरकारने उघडी करावीत. मंदिरे बंद असल्याने यामुळे लाखो लोकांचे रोजगार बुडत आहे. मोठा आर्थिक फटका नागरिकांना बसत आहे. भाविकाच्यां श्रद्धेचा विचार करत देवालये उघडी करावित असे प्रतिपादन सचिन कल्याणशेट्टी यांनी केले.
या आंदोलनात नगरसेवक महेश हिंदोळे, मिलन कल्याणशेट्टी, मोतीराम राठोड, शिवशरण जोजन, सुरेखा होलिकट्टी, ज्येष्ठ नेते शिवशरण वाले, विक्रम शिंदे, दीपक जरीपटके, पंचायत समिती सदस्य राजेंद्र बंदिछोडे, गुंडाप्पा पोमाजी, नागनाथ कुंभार, अविनाश मडीखांबे, प्रवीण शहा, यशवंत धोंगडे, बंटी राठोड, आलम कोरबू सह भाजपाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.