तरुण भारत संवाद प्रतिनिधी / पंढरपूर
राज्यातील उस्मानाबादच्या धाराशिव साखर कारखान्याच्या वतीने आज पहिल्यांदा ऑक्सिजन निर्मिती तयार करून पूर्ण झाली आहे. कारखान्यांच्या इथेनॉल प्रकल्पातून ऑक्सिजन निर्मिती करणारा अभिजीत पाटील यांचा धाराशिव साखर कारखाना पहिला कारखाना ठरणार आहे. विशेष म्हणजे या कारखान्यातून आज पहिला ऑक्सिजन टँक बाहेर पडण्याची शक्यता आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये प्राणवायू तथा ऑक्सिजनचा मोठा तुटवडा जाणवू लागला. अशातच इतर राज्यातून रो-रो रेल्वेच्या (रोल ऑन रोल ऑफ) माध्यमातून ऑक्सिजन पुरवठा झाला. अशातच राज्यातील साखर कारखान्यांनी ऑक्सिजन निर्मिती करावी असे आवाहन वसंतदादा शुगर इंस्टिटयुटच्या माध्यमातून करण्यात आले होते. यानुसार पंढरपूरच्या अभिजीत पाटील यांनी त्यांच्या उस्मानाबाद येथील धाराशिव साखर कारखान्यांच्या माध्यमातून ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभा करण्यांची तयारी दर्शवली. विशेष म्हणजे राज्यातील पहिला ऑक्सिजन निर्मितीचा पायलट प्रकल्प गेल्या 18 दिवसापासून उस्मानाबादेत उभा केना जात होतो.
सध्या धाराशिव कारखान्यातून ऑक्सिजन निर्मिती झाली आहे. साधारणपणे 97 टक्के प्युरिटीचा ऑक्सिजन याठिकाणी तयार करण्यात आला. यासाठी साखर कारखान्यांच्या डिस्टीलरी प्रकल्पामध्येच 1 कोटी रूपयांची तरतूद करून नविन मशिनरी जोडून ऑक्सिजन निर्मिती करण्यात आली. यासाठी अमेरीका, चीन आणि कोरीया याठिकाणहून यंत्रसामग्री आणण्यात आली आहे.
ऑक्सिजन प्रकल्पामधून सध्या ऑक्सिजन निर्मिती झाली आहे. सद्य स्थितीमध्ये 7 हजार लिटर ऑक्सिजन क्षमता असणारे जम्बो सिलिंडर भरण्यांचे काम सुरू करण्यात आले आहे. हे सिलिंडर भरून झाल्यानंतर कदाचित गुरूवारी किंवा शुक्रवारी अक्षयतृत्तीयाच्या मुहुर्तावर येथून ऑक्सिजन प्रशासनास आणि रूग्णालयांना पुरवण्यात सुरूवात करण्यात येणार आहे.
आजपर्यत महाराष्ट्रामध्ये साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांचे अर्थकारण जोपासले. तसेच शेतकऱ्यांच्या हितार्थ अनेक समाजोपयोगी गोष्टी केल्या. पण ऑक्सिजन निर्मितीचा पहिलाच प्रयोग धाराशिव साखर कारखान्यांने केला आहे. विशेष म्हणजे यानंतर आता राज्यातील 137 कारखान्यांपैकी तब्बल 15 ते 16 साखर कारखाने ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाची तयारी करीत आहेत.
ऑक्सिजन ही सध्याची गरज ओळखून आमच्या कारखान्याच्या वतीने निर्मिती करण्यांचे निश्चित केले. यासाठी तात्काळ मशिनरी उपलब्ध करून डिस्टीलरी प्रकल्पाच्या माध्यमातून ऑक्सिजन निर्मिती पूर्ण करण्यात आली आहे. आता रूग्णांना ऑक्सिजन पुरवठा करण्यास धाराशिव कारखाना पूर्णपणे सक्षम आहे.
अभिजीत पाटील चेअरमन, धाराशिव साखर कारखाना