वैराग तरुण भारत संवाद / प्रतिनिधी
कोरोना महामारीच्या संसर्गामुळे गेल्या सात महिन्यांपासून शाळा बंद आहेत. शाळ बंद ,शिक्षण सुरू असा शासनाचा उपक्रम सुरू असला तरी ऑनलाईन शिक्षणात अनेेक अडथळे आहेत, कौटुंबिक समस्या आहेत. शेतीचा खरीप हंगाम सुरू आहे. त्यामुळे ग्रामीण भागात कुटुंबातील शाळकरी मुलांनी पालकांना आर्थिक दिलासा देत, शेतातच स्वावलंबी, आत्मनिर्भर भारताचे धडे गिरवत सोयाबीनच्या पिके काढणीसाठी शेतात पालकांना मदत करत असल्याचे दिसत आहेत.
सतत पडणाऱ्या पावसाने सोयाबीन पिकात पाणी साचले आहे. अगोदरच पावसाने पिकाचे नुकसान झाले आहे. आणखीन नुकसान टाळण्यासाठी ग्रामीण भागात लहान मुलासह घरातील सर्व सदस्य पिकाच्या काढणीच्या कामाला लागलेले दिसून येत आहेत. सोयाबीन कापणी, गोळा करणे, काढलेल्या काड्यांचे ओझे वाहने, अशी कामे ही शाळकरी मुलं करत असून आपल्या पालकांची मजुरी वाचवत आहेत. सध्या सोयाबिन काढणी मजुरीसाठी एकास तीनशे ते चारशे रुपये मोजावे लागतात. चार ते साडेचार हजार रुपये काढणी भाव एका एकर साठी मजूर मागत आहेत. त्यातही मजुरांची कमतरता, दरही चढे असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो आहे. त्यामुळे पालकांना आर्थिक दिलासा देत, स्वावलंबी, आत्मनिर्भर भारताचे धडे गिरवत शाळेतली मुले आपल्या पालकांना पिकांची काढणी, मोडणी, मळणीला मदत करताना ग्रामीण भागात दिसत आहेत. साधारण दोन एकर सोयाबीन कापणी साठी दहा हजार रुपये मजुरी जाते आहे. परत भरडण्यासाठी वेगळे पैसे मोजा. आधीच पेरणी, खुरपणी, फवारणी यासाठी खर्च झाला आहे. त्यामुळे घरच्या घरी मुलं आणि पत्नी यांच्या मदतीने हे पिक काढण्याचे काम करत असल्याने हे पैसे वाचणार आहेत. असे मालेगाव ( ता. बार्शी ) येथील शेतकरी महादेव घोडके यांनी संचार शी बोलताना सांगीतले. घोडके यांची मुले वैरागच्या खाजगी प्राथमिक शाळेमध्ये शिक्षण घेतात. पृथ्वीराज घोडके इयत्ता चौथी मध्ये तर मुलगी राजनंदनी इयत्ता सहावी मध्ये शिक्षण घेत आहे. परंतू ऑनलाईन शिक्षणामध्ये अनेक अडथळे येत आहेत. कोरना संसर्गाच्या प्रादुर्भावात मुले शाळेपासून दूर आहेत. मोबाईलच्या साह्याने शिक्षण सुरू आहे. परंतू पालकांकडे अँड्रॉइड मोबाइल, इंटरनेटची सुविधा यांची कमतरता असल्याने काही मुलांना शिक्षणापासून दूर राहावे लागत आहे. तर काही ठिकाणी इंटरनेट रेंज येत नसल्याने ऑनलाइन शिक्षण खंडीत होत आहे. यावर्षी मुलांच्या शिक्षणाविषयी अनास्थाच दिसून येत आहे. वर्गातले अध्यापन आणि ऑनलाईन अध्यापन यामध्ये खूप अंतर व फरक आहे. प्रत्यक्ष अध्यापन हेच प्रभावी अध्यापन असते. लहान मुलांना तंत्रज्ञानाचा धोका असून मोबाईल हाताळणे म्हणजे मोबाईलची सवय लागणे याकडे घेऊन जाणारे आहे. असे अनेक पालकांचे मत आहे. सध्या खरीब पिकांच्या काढणी, मोडणीचा हंगाम सुरु असून ग्रामिण भागात जमेल तशी शाळा विद्यार्थी शिकत असून शेतातील कामांसाठी आपल्या पालकांना मदत करत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे कोरोना संसर्ग लवकर आटोक्यात येणेेे गरजेचे असून कधी एकदा शाळा सुरु होते असे मुलांना वाटत आहे.