औज व चिंचपूर बंधाऱ्यातील पाण्याची पातळी खालावली
महापालिकेचे पाटबंधारे विभागाला पत्र; वेळेत पाणी नाही सोडले तर येणार अडचण
प्रतिनिधी/सोलापूर
सोलापूर शहर हद्दवाढ भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या औज व चिंचपूर बंधाऱ्यातील पाण्याची पातळी खालावत चालली आहे. अवघे अकरा दिवस म्हणजेच 25 मार्चपर्यंत पुरेल इतकेच पाणी बंधाऱ्यात उपलब्ध आहे. शहरासाठी पाणी सोडण्याबाबतचे पत्र महापालिका प्रशासनाने पाटबंधारे विभागाला दिल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी संजय धनशेट्टी यांनी दिले.
दरवषी उन्हाळ्यात पाणीटंचाई सोलापूरकरांच्या नशिबी आहे. उन्हाच्या तीव्रतेमुळे बाष्पीभवन होऊन पाणी घटण्याचे प्रमाण अधिक असते. पाऊस जास्त झाले तरी साठवणूक क्षमताच नसल्याने अतिरिक्त पाणी वाहून जाते. त्यामुळे पाऊस जास्त असो की कमी सोलापूर शहराला पाणी समस्या कायम भेडसावत असते. उन्हाळ्यात पाण्याची कमी जाणवत असल्याने तर पावसाळ्यात पाणी मुबलक असताना प्रशासनाची अंतर्गत वितरण व्यवस्था सुरळीत नसल्याने शहराचा पाणीप्रश्न कायम आहे.
मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच सूर्यनारायणाने आग ओकण्यास सुरुवात केल्याने पाण्याची पातळी घटत आहे. यापूर्वी 25 जानेवारी रोजी उजनी धरणातून सोलापूरसाठी पाणी सोडण्यात आले होते. दोन्ही बंधारे पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर शहराची 55 दिवसांची तहान भागते. आजमितीला बंधाऱयामध्ये शहरवासियांची 11 दिवसांची तहान भागेल इतकेच पाणी आहे. त्यामुळे शहराला उजनी धरणातून पाणी सोडण्यात यावे, असे महापालिकेने पाटबंधारे विभागाला पत्राद्वारे कळविले आहे. वेळेत पाणी सोडल्यास शहराला नियमित पाणी मिळेल अन्यथा शहरवासियांना पाणी संकटाला सामोरे जावे लागणार आहे.