प्रतिनिधी / बार्शी
यंदा पावसाने मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये थैमान घातलेले आहे. सरासरीपेक्षा तीस ते चाळीस पट पाऊस या वर्षी जास्त झाला आहे. झालेल्या पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून शेतामधील उभ्या फळबागा, पीक पूर्णपणे पाण्यात गेलेले आहेत. नदीकाठी अनेक शेतकऱ्यांचे पीक वाहून गेले तर काहीजणांची शेतीतील माती वाहून गेले आहे. पाऊस थांबताच सर्व राजकीय नेते सामाजिक संघटना यांनी प्रशासनाकडे त्वरित पंचनामे व्हावे यासाठी मागणी केली होती.
याबाबत बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत, प्रांताधिकारी हेमंत निकम, तहसीलदार सुनील शेरखाने यांच्या उपस्थितीत अधिकाऱ्यांची बैठक बार्शी तहसील कार्यालयात घेतली होती. या बैठकीत पंचनामे तात्काळ पूर्ण व्हावी व शेतकऱ्याला मदत मिळावी अशी भूमिका आमदार राऊत यांनी घेतली होती, तर माजी मंत्री दिलीप सोपल यांनी सुद्धा थेट जिल्हाधिकारी यांना भेटून तात्काळ पंचनामे व्हावेत अशी आग्रही मागणी केली होती. या नंतर कोणत्या गावासाठी कोण अधिकारी पंचनामा करणार यांची यादी प्रसिद्ध झाली असून अजूनही पंचनामे सुरू नाहीत. याबाबत तहसीलदार सुनील शेरखाने यांना विचारले असता त्यांनी सांगितले की शेतामधील वापसा अजून झालेला नाही. त्यामुळे पंचनामे करण्यास उशीर होत आहे. मात्र पंचनामे करण्याचे असे कोणतेही लेखी आदेश अजूनही बार्शीत तहसीलला प्राप्त नाहीत. पंचनामे तातडीने पूर्ण होणे गरजेचे आहे. मात्र बार्शीत अजूनही पंचनामे सुरू नाहीत मात्र शेजारील उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये 70 टक्के पंचनामे पूर्ण झाल्याचे अधिकृत व खात्रीलायक माहिती आहे.