तरुण भारत संवाद प्रतिनिधी/बार्शी
बार्शी शहरांमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग अधिक तीव्र गतीने वाढत असून रोज कोरोना अँटिजेन घेतल्या जाणाऱ्या टेस्टमध्ये हे कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. मात्र अनेक नागरिक आपली लक्षणे लपवत असून प्रशासनास खोटी माहिती देतात अथवा घरच्या घरी खाजगी उपचार करून बरे होण्याचा प्रयत्न करत आहेत असे दिसत आहे. यात आता बार्शी शहरांमध्ये भाजीपाला आणि फळ विक्रेत्यांची संख्या जास्त असल्याने त्यांच्यापासून कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये यासाठी काळजी घेणे गरजेचे आहे. यामुळे केंद्र शासन महाराष्ट्र शासन यांच्या सूचनेनुसार बार्शी शहरांमध्ये सर्व भाजीपाला विक्रेते आणि फळ विक्रेते यांची कोरोना चाचणी घेण्यात येणार असल्याचे आज नगरपालिका प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.
मात्र यावेळी बार्शीतील इतर किराणा,कापड, सोन्याचे, भांड्याचे व्यापारी इतर सर्व व्यापारी यांची कोरोना चाचणी करणे गरजेचे आहे. मात्र प्रशासन त्याबाबत कोणताही ठोस निर्णय अजून पर्यंत तरी घेऊ शकत नाही ही खेदाची बाब आहे.
कोविड 19 ची अँटिजेन टेस्ट तात्काळ होणारी चाचणी असून याचा अहवाल ही अगदी 15 ते 20 मिनिटांमध्ये येत आहे. या टेस्टमुळे कोरोना संसर्ग झालेली व्यक्ती ही तात्काळ शोधली जात असून त्यांना समाजापासून विलग करण्याचे काम महत्वाचे असते. मात्र ही टेस्ट केवळ भाजीपाला विक्रेते आणि फळविक्रेते यांचे घेणे बरोबरच बार्शीतिल इतर सर्व व्यापारी यांचीही अँटिजेंन टेस्ट घेणे गरजेचे आहे.
याबाबत बार्शी चे तहसीलदार डी.एस. कुंभार आणि कामगार सहसंचालक सोलापूर यांनी आदेश पारित केले होते मात्र बार्शी मध्ये व्यापारी संघटनांनी आणि काही राजकीय व्यक्तींनी या व्यापाऱ्यांची टेस्ट घेऊ नये अशी भूमिका घेतल्याने हतबल होऊन तो निर्णय अमलात प्रशासनाला आणता आला नाही. फक्त भाजीपाला विक्रेते आणि फळ विक्रेते यांची चाचणी होत आहे हे महत्त्वाचे आहेच मात्र सर्व व्यापाऱ्यांची चाचणी घेतली पाहिजे अशी ठोस भूमिका प्रशासनाने घेतली पाहिजे. बार्शी शहरांमध्ये जवळपास 400 फळ विक्रेते आणि भाजी विक्रेते आहेत.