तरुण भारत संवाद प्रतिनिधी / बार्शी
बार्शी शहरांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने आणि रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना बार्शी शहरातील सर्व दुकाने, आस्थापना यांच्या मालकांनी कोरोनाची चाचणी करून त्याचा अहवाल दुकानाच्या दर्शनी भागात लावावे असा महत्त्वपूर्ण निर्णय बार्शी तहसीलदार कुंभार यांनी घेतला आहे. याबाबत बार्शी तहसीलदार कार्यालयाने कामगार आयुक्त सोलापूर यांना तसे आदेश देण्याचे पत्र लिहिले असून कामगार आयुक्त कार्यालय सोलापूर यांनीही आज आदेश निर्गमित केले आहेत.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, बार्शी शहरांमध्ये दिनांक 16 जुलै ते 26 जुलै पर्यंत असा दहा दिवसाचा कडक लॉकडाऊन चालू आहे. त्यातच आज प्रांताधिकारी हेमंत निकम आमदार राजेंद्र राऊत, माजी आमदार दिलीप तहसीलदार कुंभार, बार्शी पोलीस उपाधीक्षक सिद्धेश्वर भोरे व बार्शीतील सर्व व्यापारी संघटनांचे अध्यक्ष यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत बार्शी शहरातील लॉकडाऊन अजून पाच दिवस म्हणजेच 31 जुलैपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यात आता लॉकडाऊन संपल्यानंतर सर्व व्यापारी आपली दुकाने उघडण्यासाठी उत्सुक असतात मात्र आता व्यापाऱ्यांना त्यांची कोरणा चाचणी करून जर त्याचा अहवाल निगेटिव्ह आला तरच दुकान उघडण्यास परवानगी देण्यात येणार आहे असा निर्णय बार्शीचे तहसीलदार कुंभार यांनी घेतला आहे व तशा आशयाचे पत्र कामगार आयुक्त सोलापूर यांनीही बार्शीतील सर्व दुकानदारांना दिले आहे.
बार्शीतील सर्व दुकानदार आणि अस्थापना यांचे संचालक, मालक यांनी खाजगी किंवा शासकीय प्रयोगशाळेतून कोरोनाची चाचणी करणे बंधनकारक झाले असून आता कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी प्रत्येक दुकानदाराने ही कोरोना चाचणी करणे गरजेचे आहे . बार्शी शहरातील कोरोना विषाणूचा प्रसार आणि वाढलेला प्रादुर्भाव थांबवण्यासाठी बार्शी तहसील कार्यालयाने घेतलेला निर्णय स्वागतार्ह असल्याची भावना आज अनेक सामाजिक जाणकार यांनी व्यक्त केली आहे.