तरुण भारत संवाद प्रतिनिधी/बार्शी
गेल्या आठ दिवसांपासून रेशनचा गहू तांदूळ काळाबाजार संदर्भात बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीमधील आडत्यांना पोलिसांच्या चौकशीला सामोरे जावे लागत आहे. चौकशी दरम्यान पोलीस नाहक त्रास देत आहेत. आमचे आडते बांधवांवरती गुन्हे दाखल होऊन अटक होणे किंवा पोलिस स्टेशनला घेऊन जाणे व बसवून ठेवणे असा त्रास बऱ्याच आडत्यांना होत आहे. याच्या निषेधार्थ आणि इतर अनुषंगिक मागण्यासाठी बार्शी बाजार समितीमधील व्यवहार आजपासून बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती बार्शी मर्चंट असो. सचिव भरतेश गांधी यांनी दिली.
याबाबत जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,आम्ही सर्व व्यापारी आडते असून भुसार माल शेतकऱ्यांकडून येतो व खरेदीदार तो भुसार माल घेतात. शेतकरी व व्यापारी यांच्यातील आम्ही मध्यस्थी आहोत. सध्या काही ठिकाणी गहु व तांदुळ पोलिसंकडून जप्त करण्यात आला आहे असे आम्हाला समजले आहे. परंतु आमचेकडे येणारा गहु हा शेतकऱ्याचा आहे का शासकीय आहे याची आम्ही खात्री करु शकत नाही. किंवा आम्हाला समजण्याचे कारण नाही. आमचे पिक अपवाले(वाहनवाले) जे शेतकरी यांच्या शेतीमालाची वाहतूक करुन माल आमचे आडतीला पोच करतात व सौदे होऊन ते खरेदीदार घेतात. कोणता माल सरकारी आहे हे समजण्याचे किंवा चौकशी करण्याचा आमचा अधिकार नाही किंवा आम्हाला त्याचे ज्ञान नाही. तरी आमची विनंती आहे की कृषी उत्पन्न बाजार
समिती मध्ये येणारा माल हा शासनाच्या यंत्रणेने तपासावा त्याकरीता शासकीय अधिकारी पुरवठा निरीक्षक यांची. नेमणूक करावी. कोणता माल विकावा विक्री करावा किंवा नाही याची आम्हाला परवानगी जिल्हाधिकारी हे नेमून देेतील त्या अधिकाऱ्याने आम्हाला द्यावी. त्या बद्दल आमची तक्रार नाही.
परंतु विनाकारण कोणतीही खात्री न करतासरकारी धान्य आहे का शेतकरी धान्य आहे याची सक्षम अधिकारी यांच्याकडून खात्री न करता आम्हाला होणारा त्रास थांबवावा. असे म्हटले आहे .पोलिसांचा हा त्रास न थांबल्यास आम्ही आडत बाजार बेमुदत बंद ठेवणार असल्याचे म्हटले आहे.या निवेदनाची प्रत पोलीस निरीक्षक बार्शी याना ही दिली आहे.