तरुण भारत संवाद प्रतिनिधी / बार्शी
जागतिक वृक्ष संवर्धन दिनाचे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून बार्शी शिवसेनेच्यावतीने बार्शी शहरातील मुख्य रस्ता पांडे चौक, सोमवार पेठ या रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवडीचा कार्यक्रम राबविण्यात आला. यावेळी बार्शी शिवसेनेने या मुख्य रस्त्यावरील दोन्ही बाजूस वृक्षारोपणासाठी नगर पालिकेची परवानगी न घेता खड्डे खांदल्याने बार्शी शहर शिवसेनेचे नेते भाऊसाहेब आंधळकर, राजेंद्र गायकवाड व इतर अश्या पाच व्यक्ती यांच्या विरुद्ध बार्शी शहर पोलीस ठाणे येथे बार्शी नगरपरिषदेच्यावतीने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त बार्शी शहराच्या सोमवार पेठ या मुख्य रस्त्यावरती विविध प्रकारच्या उंच आणि मोठ्या झाडांची लागवड करण्यात आली आहे. हा कार्यक्रम बार्शी शहर शिवसेनेने आयोजित केला होता. बार्शीतील सोमवार पेठ हा रस्ता मुख्य बाजारपेठेचा रस्ता असून बार्शी शहराचे आकर्षण आणि केंद्रबिंदू मानला जातो. या पांडे चौकामध्ये रोज हजारो लोकांची येण्या-जाण्याची वर्दळ असते तर याच रस्त्यावर ती वर्षी नगरपरिषदेचे कार्यालय, भगवंताचे मंदिर बार्शी तालुका पोलीस ठाणे, आणि इतर महत्त्वाची कार्यालय आणि बँका आहेत. या रस्त्याचे सुशोभीकरण आणि पर्यावरण जतन यासाठी रस्त्याच्या दुतर्फा मोठी झाडे लावण्याचा कार्यक्रम शिवसेनेने हाती घेतला असून झाडे लावण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आतापर्यंत या रस्त्याच्या दुतर्फा 40 ते 50 झाडे फायसन, तिकोना, कदंब या प्रकारची उंच वाढणारी झाडे लावण्यात आली असून ही झाडे कोणालाही त्रासदायक होणार नाहीत अशाप्रकारे लावण्यात आली असल्याची ची माहिती शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर यांनी दैनिक तरुण भारत संवाद बोलताना दिली. या वृक्षलागवडीचा कार्यक्रम घेण्यासाठी शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर यांच्यासह राजेंद्र गायकवाड अण्णासाहेब नगरकर ,सचिन धावारे व इतर कार्यकर्त्यांनी कष्ट घेतले आहेत
बार्शी शिवसेनेने सोमवार पेठ या ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावण्यासाठी विनापरवाना खड्डे घेतल्यामुळे बार्शी नगर परिषदेचे उपनगर अभियंता दिलीप रामचंद्र घोडके यांनी बार्शी शहर पोलीस ठाणे या ठिकाणी गुन्हा दाखल केला असून बार्शी शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर, अण्णासाहेब नगरकर, राजेंद्र गायकवाड ,सचिन धावारे विश्वजीत जाधवर या पाच जणांविरुद्ध सार्वजनिक रस्त्याच्या मालमत्तेचे नुकसान केले म्हणून भारतीय दंड विधान कलम 431, 34 सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक अधिनियम 1984 चे कलम तीन व जिल्हाधिकारी यांची संचारबंदी उल्लंघन कलम 188 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.