प्रतिनिधी / वैराग
वैराग व परिसरातील गावांमध्ये वाढता कोरोना रुग्णांचा संसर्ग व होणारा प्रादुर्भाव रोखण्यात जनतेचे सहकार्य व वैराग प्राथमिक आरोग्य केंद्राने केलेले नियोजन यांची साथ मिळाल्याने गेल्या दोन दिवसात नविन कोरोना रुग्ण आढळून आले नाहीत. लवकरच वैराग शहर कोरोनामुक्त होईल व बार्शी शहरासाठी सुध्दा ‘वैराग पॅटर्न’ राबविणार असल्याचे प्रांताधिकारी हेमंत निकम यांनी सांगितले. वैराग (ता. बार्शी) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैराग व परिसरातीला कोरोना रुग्ण संसर्गाबाबत आढावा बैठक प्रसंगी प्रांतअधिकारी हेमंत निकम बोलत होते. यावेळी तहसिलदार डी.एस. कुंभार, डॉ. जयवंत गुंड, डॉ. अजित सपाटे, आरोग्य कर्मचारी वृंद उपस्थित होते. सध्या वैराग प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जयवंत गुंड यांच्या मार्गदर्शनाखाली सिस्टर, आशा वर्कर, अंगणवाडी शिक्षिका, सेविका, शिक्षक, शिक्षिका, यांच्या टीमच्या साह्याने दररोज घरोघरी जाऊन कुटुंबातील सदस्यांची माहिती घेतली जात आहे. प्रत्येक व्यक्तीचे तापमान व ऑक्सीजन तपासणी केली जात आहे. आजारी व्यक्तिची नोंद घेऊन तात्काल उपचारासाठी पाठविले जात आहेत. यामुळे नविन रुग्णांवर पूर्णतः नियंत्रण मिळाले आहे.जनतेने संचारबंदीचे पालन करत घरात राहून सहकार्य केले आहे. त्यामुळे कोरोना साखळी तोडण्यास मदत झाली आहे.
आणखीन काही दिवस जनतेने प्रशासनास सहकार्य करावे. लवकरच वैराग व परिसरातील गावे कोरोना मुक्त होतील असा आशावाद प्रांताधिकारी हेमंत निकम यांनी व्यक्त केला .सासुरे हद्दीतील कॉरंटाईन सेंटरकडे अधिक लक्ष दिले जात असून डॉ. अजित सपाटे यांच्या मदतीसाठी स्टाफ व साधन सामुग्री व सुविधा तात्काल पुरविण्यात आल्या आहेत. तर नागरीकांनी घाबरु नये, पण काळजी घ्यावी. कोरोना रूग्णांचा भविष्यातील वाढता संसर्ग पाहता वैराग परिसरासाठी सोलापूर व मोहोळ रोड लगतचे विद्या मंदिर हायस्कुल, दोन मंगल कार्यालये व एक शाळा अशा आणखी तीन जागा कॉरंनटाईन सेंटरसाठी अधिग्रहण करण्यात आल्याचे प्रांत अधिकाऱ्यांनी यावेळी बोलताना सांगितले.