तरूण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
रविवारी रात्री साडे नऊच्या दरम्यान लक्ष्मीनगर बाळे येथे आबा सावंत यांच्या घरासमोर दोन साप निघाले आहेत अशी माहिती सागर धाकपाडे यांनी सुरेश क्षीरसागर यांना फोनवरून दिली. परत थोडयावेळाने रोहन तोडकरी यांनी क्षिरसागर यांना फोनवर सांगितले की, आबा सावंत यांच्या घराच्या समोर दोन सापाचे मिलन चालू आहे. असे सांगितल्यानंतर रोहन व त्याचे मित्र यांना पुढे जाऊन सापाच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यास सांगितले व मोबाईल मध्ये व्हिडीओ घेण्यास सांगितले.
काही मिनिटातच सुरेश आणि सोमानंद डोके पण त्या ठिकाणी पोहचले. सुरेश यांनी दोन सापांना पाहून धक्काच बसला. कारण ते दोन साप वॉल्सचा मण्यार प्रजातीचे विषारी साप होते. त्या सापांची लांबी साधारण चार फूट होती. दुर्मिळच दिसणारा वॉल्सचा मण्यार साप मात्र बाळे येथील लक्ष्मीनगर परिसरात नेहमी आढळतो. आजपर्यंत बाळे टीमने कधीही या वॉल्सच्या मण्यार सापांचे द्वंद्व युद्ध पाहिलेले नव्हते हा दुर्मिळ योग्य तब्बल अर्धा तास पाहण्याची संधी बाळे टीमला मिळाली सुरेश क्षीरसागर यांनी पण तो नजारा त्यांच्या मोबाईल मध्ये कैद केला. आजपर्यंत धामण, नाग इ. सापांचे द्वंद्व अनेकवेळा पहायला मिळाले होते परंतू वाल्सच्या मन्यारचे दुर्मिळ द्वंद्व युद्ध पाहण्याची मेजवानी पहिल्यांदाच मिळाल्याची चर्चा निसर्गप्रेमीतून होत आहे.
तेथील नागरीकांनी मोठ्या प्रमाणात साप पाहण्यास गर्दी केली होती व त्यावेळी सुरेश क्षीरसागर यांनी सांगितले की ते दोन सापांचे मिलन नसून ते दोन वॉल्स मण्यार विषारी नर सापाचे द्वंद्व युध्द आहे हे करत असताना ते एकमेकांनाच्या माना उंच करून एकमेकाला शरीराच्या वजनाने खाली पाडण्याचा प्रयत्न करतात. परंतु चावत नाही आणि जो नर साप त्या प्रतीद्वंद्वात विजयी असेल त्या परिसरातील सगळ्या मादी साप त्याच्या बरोबर प्रजनन करून पुढची पिढी वाढवतात. तसेच ही लढाई काही वेळा प्रादेशिक (Territorial ) असू शकते असे तज्ञांचे मत आहे.
खरंतर त्या सापांना पकडणार नव्हतो पण मनुष्य वस्तीत ते दोन साप आल्याने त्या सापांना पकडणे महत्वाचे होते. काहीवेळाने वॉल्स मण्यार सापांचे द्वंद्व युध्द थांबले असता एक साप बाजुला मोकळ्या जागेत वाढलेल्या गवतात निघून गेला व सुरेश आणि सोमानंद यांना दुसऱ्या सापाला पकडण्यात मात्र बाळे टीमला यश आले. त्यांनी त्या सापाला एका प्लास्टिक बरणीत अलगद बंद केले व मनुष्य वस्तीपासून काही थोड्या लांब अंतरावर निसर्गाच्या सानिध्यात पुन्हा सोडून देण्यात आले.