पुर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून हाणामारी
तालुका प्रतिनिधी / अक्कलकोट
अक्कलकोट तालुक्यातील ममनाबाद येथे ३२ वर्षीय तरुणावर प्राणघातक हल्ला करून तीक्ष्ण हत्याराने डोक्यावर पाठीत वार करून भरदिवसा गावात खून करण्यात आला. या हल्ल्यात पाच जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार चालू आहेत. ही घटना दि १२ जून रोजी ममनाबाद गावात साडेपाच वाजता घडली. विश्वनाथ बसण्णा पाटील वय ३२ असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्याकडून मिळालेली माहिती अशी की, मागील दोन दिवसांपूर्वी स्वस्त धान्य दुकानाचे धान्य ठेवण्याच्या कारणावरून झालेल्या भांडणाचा राग मनात धरून व म्हशीचे दूध रस्त्यावर काढण्याच्या कारणावरून चंद्रकांत मसण्णा गायकवाड, धोंडिबा मसण्णा गायकवाड, मसण्णा धोंडिबा गायकवाड, अंबादास शंकर कोळी, निंगप्पा शंकर कोळी, सूर्यकांत शंकर कोळी,बलभीम शंकर कोळी राहणार सर्व ममनाबाद ता अक्कलकोट यांनी विश्वनाथ बसण्णा पाटील (वय ३२) यास डोक्यात कुऱ्हाडीने जबर घाव घालून व पाठीवर तलवारीने वार करून ठार मारले आहे. याचवेळी सिद्धाराम हणमंत पाटील, रामचंद्र हणमंत बिराजदार व त्यांची मुले संजय बिराजदार व अजय बिराजदार भांडण सोडवण्यासाठी गेले असता त्यांना ही वरील लोकांनी लाकडी काठी, दगड व कुऱ्हाडीने मारहाण करून गंभीर जखमी केले आहे व तिथे थांबलेल्या स्विफ्ट गाडीचे नुकसान केले आहे. अशी तक्रार सिद्धाराम हणमंत पाटील यांनी अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात दिली आहे.या घटनेची नोंद रात्री उशिरा दाखल झाली.
या घटनेतील सर्व जखमींना अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले असून गंभीर जखमी असलेले संजय बिराजदार वय २१ यांना सोलापूर येथे दाखल करण्यात आले आहे.या घटनेची माहिती मिळताच सोलापूर ग्रामीणचे अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे,उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ संतोष गायकवाड, पोलीस निरीक्षक गोपाळ पवार व पोलीस कर्मचारी घटनास्थळी भेट दिले.या गुन्ह्याचा पुढील तपास अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोपाळ पवार हे करीत आहेत.