प्रतिनिधी / दक्षिण सोलापूर
दक्षिण सोलापूर तालुक्यातील लवंगी येथील भीमा नदीच्या पात्रात आघोंळीस गेलेले चार मुले,मुली वाहून गेल्याची घटना शनिवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली आहे.या घटनेची माहिती मिळताच मंद्रूप पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.समीक्षा शिवाजी तानवडे (वय १३) ,अर्पिता शिवाजी तानवडे वय (९),आरती शिवानंद पारशेट्टी वय (१३),विठ्ठल शिवानंद पारशेट्टी वय (११)असे बेपत्ता झालेल्या मुलां-मुलींची नांवे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की,शिवाजी रामलिंग तानवडे (वय ४० रा.वाघोली हल्ली राहणार लवंगी ता.द. सोलापूर) हे भीमा नदीमध्ये पोहण्यासाठी गेले असता थोड्या वेळाने त्यांच्या पाठीमागे तिच्या दोन मुली समीक्षा व आर्पिता व त्यांच्या सोबत मेव्हण्याचे मुलगा विठ्ठल व मुलगी आरती असे चौघे नदीकडे आले.यावेळी त्यांना शिवाजी तानवडे यांनी घराकडे जाण्यास सांगितले. त्यानंतर शिवाजी तानवडे हे पोहत नदीमध्ये आत गेले. थोड्या वेळाने चौघे मुले-मुली परत नदीकडे आले.
यातील मुलगी समीक्षा हिला पोहता येत होते परंतु अर्पिताला थोडे- थोडे पोहोता येत होते. त्यावेळी ते चौघे नदीपात्रात अंघोळीसाठी उतरले, समीक्षा हिस पाण्यात पोहत असताना ती बुडू लागली तिला आरतीने पकडले व अर्पिता हिला विठ्ठल याने पकडल्याने ते चौघेजण बुडू लागले. त्यांचा आवाज ऐकून शिवाजी लगेच त्यांच्याजवळ पोहत आला.त्यांने समीक्षा व आरती यांना थोडेसे बाजूला किनाऱ्याजवळ सोडून त्यांना कडेला जाण्यास सांगितले. अर्पिता व विठ्ठल यांना नदीतून बाहेर काढण्यास ते परत नदीत आत गेले.
यावेळी त्यांना कडेला आणत असताना इकडे काठावरील समीक्षा व आरती या पाण्याच्या प्रवाहामुळे बुडू लागल्या, इतक्यात शिवाजीच्या ताब्यातील विठ्ठल व अर्पिताही निसटले व तेही पाण्यात बुडू लागले.एकदम चारही जण बुडू लागल्याचे पाहून शिवाजीचा धीर सुटल्याने तो पण पाण्यात बुडू लागला.हे पाहून त्याचे नातेवाईक राचाप्पा उर्फ अप्पू संगप्पा पारशेट्टी याने शिवाजीला यास बाहेर काढले.पण चारही बालके पाण्यात वाहून गेली.या घटनेची माहिती मिळताच मंद्रूपचे सहाय्यक पोलिस निरीक्षक डाॅ.नितीन थेटे,उपनिरीक्षक गणेश पिंगुवले,पोलीस हवालदार साहेबराव गुंडाळे,बी.टी.राठोड,पोलीस अंमलदार शंकर पाटील,गावचे सरपंच संगमेश बगले-पाटील व ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली यावेळी स्थानिक मच्छमारांच्या सहाय्यांने बाहेर रात्री उशीरापर्यंत शोधकार्य सुरू होते. पण चारही बालके पाण्यात वाहून गेले.
समीक्षा तानवडे इयत्ता आठवीत अर्पिता तानवडे व आरती पारशेट्टी दोघीजण सातवीत आणि विठ्ठल पारशेट्टी पाचवीत शिकत होता.या घटनेमुळे लवंगी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी प्रभाकर शिंदे यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.