तरूण भारत संवाद प्रतिनिधी / लातूर
पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या माध्यमातून पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांचा खात्यात दोन हजार रुपये जमा करून देशातील काही शेतकऱ्यांशी चर्चा केली. या योजनेतंर्गत महाराष्ट्रातील लातूर तालुक्यातील साखरा येथील शेतकरी बाळासाहेब नरारे यांच्याशी संपर्क साधला. यावेळी त्यांनी बँक ऑफ महाराष्ट्रच्या किसान क्रेडिट कार्ड योजनेचा फायदा झाल्याचे सांगितले.
बाळासाहेब नरारे यांना साडेपाच एकर शेती आहे. या शेतीवर जवळपास ८ ते ९ कुटुंबं अवलंबून आहेत. वर्षाला त्यांना साधारण दोन लाख रुपयांचे उत्पन्न शेतीतून मिळते. गेल्या पाच वर्षापासून बँकेशी जोडले गेले असल्याची माहिती त्यांनी दिली. आज देशाच्या पंतप्रधानांशी बोलण्याची संधी मिळाली याबद्दला त्यांनी आनंद व्यक्त केला. बँक ऑफ महाराष्ट्राच्या सहकार्यातून शेतीसाठी अर्थसहाय्य मिळाल्याचं समाधान व्यक्त केले. शेती करत असताना आपल्याला बँक ऑफ महाराष्ट्राच्या किसान क्रेडिट योजनेचा लाभ झाल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
बँकेच्या दृष्टीने गैरवाचा दिवस : गिरीश भगुरकर
पंतप्रधानांशी बोलण्याची संधी मिळालेले महाराष्ट्रातील लातुर जिल्ह्यातील शेतकरी हे बँक ऑफ महाराष्ट्राची जोडले गेले आहेत त्यामुळे आमच्यासाठी ही गोष्ट गौरवाची आहे. लातूर येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेतुन मराठवाड्याच्या पाच जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना या योजनेतंर्गत कोरोनाचे संकट संपताच लाभ मिळेल या दृष्टीने आमचा प्रयत्न सुरु असल्याची माहिती विभागीय व्यवस्थापक गिरीश भगुरकर यांनी ‘तरूण भारत संवाद’ प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केली.