मिरजेमार्गे धावणार असल्याने बेळगावला फायदा
बेळगाव / प्रतिनिधी
सोलापूरच्या नागरिकांना थेट गोव्याला येता यावे याकरिता, सोलापूर ते वास्को अशी रेल्वे सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. अनेक दिवसांपासून हा प्रस्ताव रेल्वे विभागाकडे होता. या प्रस्तावावर चर्चा करण्यात येत असून लवकरच ही नविन रेल्वे होण्याची चिन्हे आहेत. आठवडय़ातून एक दिवस धावणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
सोलापूर येथून थेट गोव्याला रेल्वे नसल्यामुळे नागरिकांना रेल्वे बदलून गोव्याला जावे लागते. एकतर मिरज मार्गे बेळगावला येवून किंवा हुबळीमार्गे वास्को गाठावे लागते. तसेच थेट बसची सोयही या मार्गावर नाही. त्यामुळे निदान आठवडय़ातून एकदातरी या मार्गावर रेल्वे सुरू करण्याची मागणी होत आहे.
ही नवी रेल्वे मिरज, बेळगाव, लोंढामार्गे वास्को येथे पोहचणार आहे. यामुळे बेळगावमधून गोव्याला जाण्याकरीता आणखी एक रेल्वे उपलब्ध होणार आहे. तसेच मिरज -लोंढा मार्गावर आणखी एका रेल्वेची भर पडणार असल्यामुळे ही रेल्वे लवकर सुरू करण्याची मागणी होत आहे.
खासदारांकडून होत आहेत प्रयत्न
सध्या सोलापूरमध्ये जयसिद्धेश्वर स्वामी तर सांगली येथे संजयकाका पाटील हे दोघेही भाजपचे खासदार आहेत. त्यामुळे आपल्या कारकिर्दीत हे रेल्वे सुरू करण्यासाठी दोघांचेही प्रयत्न सुरू असल्याची माहिती आहे. या खासदारांकडून रेल्वे विभागाकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. त्यामुळे सोलापूर येथून थेट रेल्वे लवकरच सुरू होण्याची चिन्हे आहेत.