डॉ. मृणालिनी फडणवीस, कुलगुरू
सोलापूर/ प्रतिनिधी
एक कर्तृत्ववान, उत्तम प्रशासक, धर्मपरायण व कार्यक्षम राज्यकर्ती म्हणून अहिल्यादेवी होळकर हे नाव इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले आहे. त्यांचा जन्म चौंडी या छोट्याशा गावात माणकोजी व सुशिलाबाई शिंदे या दांपत्यापोटी झाला.(३१ मे १७२५–१३ ऑगस्ट १७९५). धनगर समाजात जन्मलेल्या अहिल्यादेवींचे लग्न वयाच्या आठव्या वर्षी सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या मुलाशी, खंडेरावांशी झाले. कठीण काळात अहिल्यादेवी होळकर यांनी केलेले काम आदर्शवादी व महान असून आजही त्यांचे कार्य अजरामर आहे. त्यांचे आदर्शवादी कार्य आजच्या विद्यार्थ्यांना समजावे, अभ्यासता यावे यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये अहिल्यादेवी होळकर अध्यासन केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. त्या माध्यमातून अहिल्यादेवींचा कार्य अनेकापर्यंत पोहोचला जाणार असल्याचे कुलगुरू फडणवीस यांनी सांगितले
खंडेरावांच्या आईचे नाव गौतमीबाई होते; खंडेराव हे व्यसनी, छंदीफंदी होते. पण अहिल्यादेवींनी याबाबतीत तक्रार न करता सासऱ्यांनी नेमून दिलेल्या कामात लक्ष घातले. कुशाग्र बुद्धीची देणगी लाभलेल्या या सूनबाईंवर सासऱ्यांचा मोठा विश्वास होता आणि खूप महत्त्वाचा पत्रव्यवहार ते अहिल्यादेवींवरच सोपवीत असत. खंडेरावांपासून त्यांना दोन अपत्ये झाली. मालेराव हा मुलगा आणि मुक्ताबाई ही कन्या. अहिल्यादेवींना वयाच्या अठ्ठाविसाव्या वर्षी वैधव्याला सामोरे जावे लागले. पती खंडेराव कुंभेरी येथे लढाईत मरण पावले. त्यावेळच्या प्रथेप्रमाणे त्या सती जायला निघाल्या. पण सासरे म्हणाले, “प्रजाहितासाठी तरी तुम्ही सती जाऊ नये. हे राज्य सांभाळायचे आहे.”
आपल्या सासऱ्यांच्या इच्छेचा अहिल्यादेवी होळकर यांनी मान राखला आणि सती न जाता राज्यकारभारावर आपले लक्ष केंद्रित केले. मल्हारराव ज्यावेळी मोहिमेवर असत, तेव्हा स्वतः अहिल्यादेवी राज्याचा बंदोबस्त चोख राखीत असत. मल्हाररावांच्या सल्ल्यानुसार वागत असत.मल्हारराव होळकरांना पेशव्यांनी इंदूर संस्थानची जहागीर दिली होती. दौलतीचा कारभार मोठा होता. पण १७६६ मध्ये त्यांचे निधन झाले आणि अहिल्यादेवींवर फार मोठी जबाबदारी येऊन पडली. त्यांचा पुत्र मालेराव यांना जरी सुभेदारीची वस्त्रे मिळाली, तरी ती सांभाळण्याची त्यांच्यात कुवत नव्हती. लवकरच त्यांचे देहावसान झाले. अहिल्यादेवी आता खऱ्या अर्थाने राज्यकर्ती झाल्या. पुढील अठ्ठावीस वर्षे त्यांनी राज्यकारभाराचा गाडा सैन्याच्या सहकार्याने अतिशय कुशलपणे चालविला. तिजोरीत भर घालीत त्यांनी प्रजाहिताकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले.
अहिल्यादेवी होळकर हे नाव मराठ्यांच्या इतिहासात अमर झाले. त्याला त्यांची धर्मपरायण आणि उदारवृत्ती कारणीभूत ठरली. बाई काय राज्य कारभार करणार ही दरबारी मंडळींची अटकळ त्यांनी सपशेल खोटी ठरविली. अहिल्यादेवी एक चाणाक्ष आणि सुधारणावादी राज्यकर्ती होत्या. पूर्वीच्या कायद्यांमध्ये त्यांनी परिस्थितीनुसार काही सुधारणा केल्या. करपद्धती सौम्य केली; मात्र शेतकऱ्यांकडून सारा घेणे चालू ठेवले. पाटील-कुळकर्ण्यांच्या वतन हक्कांचे संरक्षण करून गावोगावी न्याय देणारे पंच अधिकारी नेमले. त्यावेळी डोंगर मुलखातून भिल्ल व गोंड आदिवासी प्रवाशांना उपद्रव देत आणि त्यांच्याकडून भीलकवडी नावाचा कर वसूल करीत. तेव्हा बाईंनी त्यांच्याशी संवाद साधून त्यांचा कर घेण्याचा हक्क मान्य केला. त्यांच्याकडून पडिक जमिनींची लागवड करून घेतली. शिवाय त्यांना विशिष्ट हद्द नेमून दिली. जमीन करार-पट्ट्याने देण्याची पद्धत सुरू केली.
राजधानी इंदूरहून नर्मदातीरी महेश्वरला हलविली (१७७२). तिथे अनेक वास्तू बांधल्या. राजवाड्यात प्रशस्त देवघर होते. नदीला घाट बांधले. मंदिरांचा जीर्णोद्धार केला व पूर्वजांच्या स्मरणार्थ छत्र्या बांधल्या. महेश्वरहे विणकरांचे मध्यवर्ती केंद्र होते. अहिल्यादेवी यांनी वस्त्रोद्योगास उत्तेजन दिले, कोष्ट्यांची वसाहत स्थापन केली आणि उत्तम हातमागाची सणंगे तयार होतील अशी पेठ कायम केली. त्यांचा मूळ स्वभाव सौम्य असला, तरी राज्यकारभारात त्यांनी मनरूपसिंगसारख्या कुविख्यात डाकूला फाशीदिली. होळकरांच्या टांकसाळीतील नाण्यांवर बिल्वपत्र व शिवलिंग यांचे छाप असत.
मोठ्या पुतळ्यासाठी जागा निश्चितीचे काम पूर्ण
पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांचा मोठा पुतळा विद्यापीठात उभारला जाणार आहे. यासाठी जागा निश्चितीचे काम पूर्ण करण्यात आले आहे. प्रसिद्ध व नामवंत कलाकारांकडून पुतळा बनवण्याचे काम केले जाणार आहे. त्याचबरोबर नवी दिल्लीच्या विद्यापीठ अनुदान आयोग आणि राज्यशासनाकडे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या अध्यासन केंद्राबाबत प्रस्ताव पाठविला आहे. त्याचेही काम लवकरच पूर्ण होईल. त्यानंतर खऱ्या अर्थाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये अहिल्यादेवींच्या कार्याबद्दल अभ्यास आणि संशोधनाचे काम वेगाने पुढे जाईल.
कुलगुरू डॉ.मृणालिनी फडणवीस(पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर)