सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर शहर व हद्दवाढ भागाला पाणीपुरवठा करणारी टाकळी येथील जलवाहिनी गुरुवारी फुटल्याने त्याठिकाणी पाणी गळती मोठ्या प्रमाणात सुरू आहे. दुरुस्तीचे काम सुरु असल्याने शहराला शनिवारपासुन चार तर हद्दवाढ भागाला पाच दिवसाआड पाणीपुरवठा होणार असल्याचे महापौर श्रीकांचन्ना यन्नम यांनी शुक्रवारी सांगितले.
टाकळी येथील जलवाहिनी फुटल्याने या ठिकाणी पाण्याची मोठ्या प्रमाणात गळती होत आहे. पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. मनपाच्या वतीने गुरुवार पासुन जलवाहिनी दुरुस्तीचे काम सुरू आहे. या ठिकाणी महापौर श्रीकांचना यन्नम, सभागृह नेते श्रीनिवास करली, अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे आदींनी या ठिकाणची पाहणी केली. शहराला तीन दिवसाआड तर हद्दवाढ भागत चार दिवसाआड पाणीपुरवठा होत असून आता एक दिवस पुढे जाण्याची शक्यता आहे, अशी माहिती महापौर श्रीकांचना यन्नम यांनी दिली. तसेच सोलापूरकरांनी सहकार्य करावे असे आव्हान महापौरांनी यावेळी केले. यावेळी पाणी पुरवठा अधिकारी संजय धनशेट्टी, सहाय्यक अभियंता ऊस्तरगी, सहायक अभियंता मादगुंडी, सहाय्यक अभियंता येलगुलवार, एजाज शेख व मनपा कर्मचारी उपस्थित होते.