प्रतिनिधी / अक्कलकोट
अक्कलकोट तालुक्यातील हन्नुर येथील प्रसाद धर्मण्णा हाताळे वय १७ याचा घरात लाईटचे बटण बंद करत असताना विजेचा धक्का बसून मृत्यू झाला ही घटना दि ८ जून रोजी हन्नुर येथील राहत्या घरात सकाळी ७ वाजता घडली.
याबाबत माहिती अशी की,प्रसाद धर्मण्णा हाताळे वय १७ हा दयानंद महाविद्यालयात बी एस सी प्रथम वर्षात शिक्षण घेत आहे.सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुकारलेल्या लॉकडाउन मुळे गेल्या अनेक दिवसांपासून मुळगावातल्या घरीच राहण्यास आहे.सकाळच्या वेळी प्रसाद लाईटचे बटन बंद करत असताना अचानक विजेचा धक्का बसल्याने जखमी झाला.
ही माहिती लिंबण्णा सिद्धाराम हाताळे यांना सकाळी शेतात काम करत असताना त्यांचे सख्खे भाऊ प्रवीण हाताळे यांनी फोनवर सांगितले. त्यानंतर जखमी प्रसादला हन्नुर येथे उपचारासाठी दाखवण्यात आले.पण डॉक्टर अक्कलकोटला घेऊन जाण्यास सांगितल्यानंतर अक्कलकोट येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासणी करून मयत घोषित केले.प्रसादच्या पश्चात आई वडील व एक बहीण असा परिवार आहे.प्रसादच्या मृत्यमुळे गावावर शोककळा पसरली होती. सदर घटनेची खबर लिंबण्णा सिद्धाराम हाताळे यांनी अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात दिली आहे.