युक्रेनमध्ये भारताच्या सुटका अभियानाचा आज शेवटचा दिवस, युद्ध सुरुच
नवी दिल्ली, कीव्ह / वृत्तसंस्था
युद्धग्रस्त युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी केंद्र सरकारने चालविलेल्या ‘गंगा’ अभियानाची सोमवारी सांगता केली जाईल, अशी घोषणा करण्यात आली आहे. या अभियानाअंतर्गत आता जवळपास 16 हजार भारतीयांना मायदेशात आणण्यात आले आहे. या अभियानात खासगी विमान कंपन्यांची अनेक विमाने आणि भारतीय वायुदलाचा सहभाग आहे.
युपेनचा सुमी भाग वगळता आता देशातून सर्व भारतीयांनी इतर देशांमध्ये प्रवेश केला असून तेथून त्यांना भारतात आणण्यात येत आहे. रविवारी जवळपास 2 हजारांहून अधिक लोक परतले. यात प्रामुख्याने विद्यार्थ्यांचा समावेश होता. या देशात 20 हजारांहून अधिक भारतीय वास्तव्यास होते. ते शिक्षण किंवा व्यवसायासाठी तेथे गेले आहेत. तथापि, आता त्यांच्यावर या युद्धामुळे भारतात परतण्याची वेळ आली असून त्यांच्या शिक्षणावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
मारीपोल शस्त्रसंधी अपयशी
युद्धात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितरित्या देश सोडता यावा म्हणून युक्रेनमधील मारीपोल येथे काही काळापुरती शस्त्रसंधी करण्याचा निर्णय रशिया आणि युक्रेन यांनी घेतला होता. मात्र शस्त्रसंधीच्या काळातही परस्परांवर गोळीबार करण्याच्या घटनांमुळे ही युद्धबंदी अपयशी ठरली आहे. तसेच या भागात अडकलेल्या नागरिकांना तेथून बाहेर जाण्यासही अडचणी येत आहेत. सातत्याने बाँबफेक आणि गोळीबार सुरु असल्याने नागरिकांना आपल्या घरांमधून बाहेर पडून युपेनच्या सीमारेषेपर्यंत जाणे अशक्य झाले असल्याचे समजते.
तर रशिया हल्ले थांबवणार
युक्रेनच्या सैनिकांनी प्रतिकार करणे थांबविल्यास रशिया युक्रेनवरील हल्ल्यांना विराम देईल, असे आश्वासन रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी तुर्कस्थानचे अध्यक्ष एर्दोगन यांना दिले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. एर्दोगन यांनी पुतीन यांच्याशी फोनवरुन संपर्क करुन त्यांना युद्धबंदी घोषित करण्याची सूचना केली होती. मात्र, पुतीन यांनी त्यासाठी काही अटी घातल्या होत्या.
सुमी प्रांतात 700 भारतीय
युक्रेनच्या सुमी भागात 700 भारतीय विद्यार्थी अडकलेले आहेत. त्यांची सुटका करण्यावर आता लक्ष केंद्रीत करण्यात येत आहे. या भागात सातत्याने हल्ले होत असल्याने या विद्यार्थ्यांची सुटका करणे अडचणीचे झाले आहे. काही काळासाठी शस्त्रसंधी झाल्यास त्यांची सुटका करणे शक्य होणार आहे. युक्रेनमध्ये अद्यापही अडकलेल्या भारतीय नागरिकांनी त्वरित हा देश सोडण्यासाठी फॉर्म भरुन द्यावा, असे आवाहन भारताच्या युक्रेनमधील दुतावासाने केले आहे. शक्य तितक्या लवकर फॉर्म भरुन ऑनलाईन सादर करावा, अशी सूचना करण्यात आली आहे.
विमानसेवा, आर्थिकसेवा रद्द
रविवारी अनेक देशांनी रशियातील आपली विमानसेवा बंद करण्याची घोषणा केली. त्याचप्रमाणे व्हिसा, पेपाल आणि मास्टरकार्ड या कंपन्यांनीही रशियातील आपली सेवा बंद केली आहे. प्युमा या किरकोळ विक्री कंपनीनेही सेवा बंद केली. या कंपनीची रशियात 100 हून अधिक दुकाने आहेत. रशियाच्या बँकांना आता मास्टरकार्ड नेटवर्क उपयोगात आणता येणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले.
युपेनचा अणुबाँब निर्मितीचा प्रयत्न
युक्रेनकडून अणुबाँब निर्मितीचा प्रयत्न सुरु आहे, असा आरोप रशियाने केला आहे. प्लुटोनियम बाँब बनविण्याच्या जवळ हा देश पोहचला होता. त्याला या प्रयत्नात यश मिळाले असते तर रशियासाठी तो कायमचा धोका निर्माण झाला असता. त्यामुळे रशियाने युक्रेनवर हल्ला करुन त्याला हा बाँब बनविण्यापासून रोखले. तथापि, युक्रेनच्या प्रशासनाने रशियाचा हा आरोप फेटाळला आहे.
भारताने हस्तक्षेप करावा
भारत आणि रशिया यांचे चांगले संबंध आहेत. भारताने पुतीन यांना युद्ध थांबवा असे सांगावे. भारत युक्रेनकडून महत्वाच्या कृषी उत्पादनांची आयात करतो. युद्ध असेच सुरु राहिल्यास या आयातीवर परिणाम होऊन भारताचीही हानी होईल. त्यामुळे युद्ध थांबणे भारताच्याही हिताचे आहे. पुतीन यांनी युक्रेनचा अस्तित्वात राहण्याचा अधिकारच गमावला आहे. आता सर्वसामान्य भारतीयांनीही रशियावर दबाव आणावा असे आवाहन युक्रेनचे विदेशव्यवहार मंत्री दिमित्रो कुलेबा यांनी केले आहे. खार्किव्ह आणि सुमीमधून नागरिकांना बाहेर काढण्यासाठी युक्रेनने रेल्वे गाडय़ांची व्यवस्था केली आहे, असेही त्यांनी संदेशात स्पष्ट केले.
बॉक्स
शरणार्थींची संख्या 15 लाख
युक्रेनमधून पलायन केलेल्या शरणार्थींची संख्या 15 लाखांहून अधिक झाली आहे. रशियाने गेले सतत 11 दिवस युक्रेनवर हल्ले चढविले असल्याने ही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रशियाच्या आक्रमणाला तोंड देण्यासाठी युरोपियन देश आणि अमेरिकेने आणखी साहाय्य करावे. युद्ध विमाने मोठय़ा संख्येने पाठवावीत, अशी मागणी युपेनकडून रविवारी पाश्चिमात्य देशांकडे करण्यात आली आहे.
बॉक्स
ब्रिटनची सहासूत्री योजना
युक्रेनसाठी आंतरराष्ट्रीय मानवसाहाय्यता सहकार्य, युक्रेनच्या स्वयंसंरक्षणासाठी साहाय्य, रशियावर जास्तीत जास्त आर्थिक दबाव, रशियावर राजनैनिक दबाव, युरोप-अटलांटिक भागात बळकट सुरक्षा व्यवस्था आणि रशियाचा युक्रेनवरील प्रभाव संपवणे अशी सहासूत्री योजना ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी तयार केली आहे. ही योजना हा प्रभावी तोडगा ठरेल, असे प्रतिपादन त्यांनी केले आहे.