ऑनलाईन टीम / मुंबई :
ऑनलाईन द्वेष, धमकावणे, इतरांना कमी लेखणे यासारखे प्रकार रोखण्याचे आवाहन ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांनी केले आहे.
ते म्हणाले, यंदाच्या वर्षात अनेक आव्हाने आपल्यासमोर उभी आहेत. अशावेळी इंटरनेटवर समाजमाध्यमात सुरू असलेल्या घडामोडी आणि होणाऱ्या चर्चेमुळे समाजातील वातावर बिघडत आहे. त्यामुळे अशा वातावरणात आपण सर्वांनी परस्परांना सहकार्य करत वाटचाल करण्याची गरज आहे, असे आवाहन रतन टाटा यांनी केले आहे.
रतन टाटा यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट केली आहे. ऑनलाईन ग्रुप एकमेकांचे नुकसान करत असून एकमेकांना दुय्यम समजत आहेत. पुढे ते म्हणतात हे वर्ष कोणत्या ना कोणत्या रूपात सर्वांसाठीच आव्हानात्मक आहे. दुसऱ्याला कमी कसे लेखता येईल याचीच चढाओढ इंटरनेट वर सुरू आहे.
मात्र, या अशा कठीण काळात एकमेकांना कमी न लेखता सर्वांनी एकत्रित येऊन एकमेकांना मदत केली पाहिजे. या काळात एकमेकांना अधिक संवेदनशीलता, अधिक प्रेम, एकमेकांना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्याची आणि धैर्याची गरज आहे. अशा प्रकारे आपण एकमेकांची मदत केली तर सध्याच्या निर्माण झालेल्या कठीण काळाचा यशस्वीरित्या मुकाबला करता येईल, असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.