ऑनलाईन टीम / तिरुअनंतपुरम :
केरळ पोलीस कायद्यात सुधारणा करण्याच्या अध्यादेशाला राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या व्यक्तीला पाच वर्षांची शिक्षा होऊ शकते.
महिला आणि मुलांवरील सायबर गुन्हे रोखण्यासाठी हा अध्यादेश काढण्यात आल्याचे केरळच्या एलडीएफ सरकारचे म्हणणे आहे. काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी या अध्यादेशाला विरोध केला आहे. अध्यादेशामुळे पोलिसांना अधिक अधिकार मिळतील आणि प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्यालाही आळा बसेल, असे विरोधकांचे म्हणणे आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांनी यांनी एका ट्विटमध्ये म्हटले आहे की,केरळमधील एलडीएफ सरकारने सोशल मीडियावर केलेल्या तथाकथित आक्षेपार्ह पोस्टबद्दल पाच वर्षांची शिक्षा ऐकून मला धक्काच बसला. या अध्यादेशाद्वारे अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिरावून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे.