सौराष्ट्र-मुंबई रणजी लढत अनिर्णित
वृत्तसंस्था/ अहमदाबाद
2022 च्या रणजी क्रिकेट स्पर्धेतील इलाईट ड गटातील सौराष्ट्र आणि मुंबई यांच्यातील 4 दिवसांचा सामना रविवारी खेळाच्या शेवटच्या दिवशी अनिर्णित अवस्थेत राहिला. सौराष्ट्रच्या दुसऱया डावात चेतेश्वर पुजाराने 83 चेंडूत 91 धावा झळकविल्या. लंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत पुजाराला भारतीय संघातून वगळण्यात आल्यानंतर 24 तासांच्या कालावधीत पुजाराला फलंदाजीचा सूर मिळाल्याचे जाणवले.
या सामन्यात मुंबई संघाने आपला पहिला डाव 7 बाद 544 धावावर घोषित केला. त्यानंतर सौराष्ट्र संघाचा पहिला डाव 220 धावात आटोपला. मुंबईचा संघ निर्णायक विजय मिळविण्यासाठी प्रयत्न करीत होता. सौराष्ट्रने दुसऱया डावात 116 षटकात 9 बाद 372 धावा जमवित हा सामना अनिर्णित राखला. सामना संपला त्यावेळी सौराष्ट्र संघाने केवळ 48 धावा अधिक जमविल्या होत्या. आतापर्यंत 41 वेळा रणजी करंडक जिंकणाऱया मुंबईला या सामन्यात 3 गुण तर सौराष्ट्रला 1 गुण मिळाला. मुंबई संघातील मुलानीने 114 धावात 7 गडी बाद केले.
सौराष्ट्रच्या दुसऱया डावात स्नेल पटेलने 98 धावा झळकविल्या. त्याचे शतक दोन धावांनी हुकले. हार्विक देसाईने 62 धावांचे योगदान देताना पटेलसमवेत पहिल्या गडय़ासाठी 163 धावांची भागीदारी केली. पुजाराने विश्वराज जडेजासमवेत चौथ्या गडय़ासाठी 101 धावांची भागीदारी केली. पुजाराने 83 चेंडूत 91 धावा जमविताना 16 चौकार आणि 1 षटकार खेचला.
संक्षिप्त धावफलक
मुंबई प. डाव 7 बाद 544 डाव घोषित, सौराष्ट्र प. डाव 220, सौराष्ट्र दु. डाव 116 षटकात 9 बाद 372 (स्नेल पटेल 98, पुजारा 91, हार्विक देसाई 62, मुलानी 7-114).