मध्यप्रदेशातील बैतूल जिल्हय़ातील बाचा हे गाव त्याच्या आगळय़ा वैशिष्टय़ामुळे प्रसिद्ध आहे. या गावात चुली किंवा गॅसच्या शेगडय़ा फारशा नाहीत. संपूर्ण गाव सौर ऊर्जेवर आपले अन्न शिजवते. आणि त्याचेच सेवन केले जाते. त्यामुळे मोठय़ा प्रमाणावर इंधनाची बचत होऊन पर्यावरणाचे संवर्धन होत आहे.
बाचा हे आदिवासी बहुल गाव असून सातपुडा पर्वत रांगेच्या पायथ्याशी आहे. येथील वातावरण अल्हाददायक आहे. तथापि आजुबाजूच्या परिसरांमध्ये कारखाने निर्माण झाल्याने धुलीकण व प्रदुषित करणाऱया वायुंचे प्रमाण वाढले आहे. शिवाय आजुबाजूच्या प्रदेशात जंगलतोड मोठय़ा प्रमाणात झाली आहे. त्यामुळे वायु प्रदुषणात मोठी वाढ दिसून येते. या सर्व समस्यांतून मुक्तता मिळविण्यासाठी प्रशासनाने सौर चुलींवर भर दिला. घराघरात सौर चुली असून त्यावरच स्वयंपाक केला जातो. त्याच अन्नाचे सेवन केले जाते. अन्य कोणत्याही मार्गाने अन्न शिजविण्याला गावकऱयांचा विरोध आहे. गावकऱयांच्या इच्छेमुळे हा प्रयोग 100 टक्के यशस्वी झाल्याचा दावा करण्यात येतो. सौर ऊर्जेचा उपयोग अधिकाधिक क्षेत्रामध्ये करण्यासाठी विश्व भारती संस्थेने पुढाकार घेतला आहे.
या उपक्रमाचे सुपरिणाम पाच वर्षातच दिसून आले आहे. इंधनासाठी लाकडे मिळविताना प्रचंड प्रमाणात वृक्षतोड करण्यात आली होती. तथापि आता ऊर्जा मिळविण्यासाठी लाकडे किंवा कोळशाची गरज नाही. परिणामी वृक्षतोड थांबली आहे. त्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी वाढली असून पूर्वी कोरडय़ा पडलेल्या विहिरींना पाणी लागत आहे. तसेच गावातील दुर्लक्षित तळीही दुरुस्त करण्यात आली आहेत. वृक्षतोड थांबल्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी वाढते, असे दिसून आले आहे. या गावाचे अनुकरण आता अन्य गावांनी करावे यासाठी प्रयत्न होत आहे.