वाढते अपघात विद्यार्थ्यांच्या जीवावर : रस्ते सुरक्षा नियमावलीबाबत जागृती कार्यक्रमांचे आयोजन
प्रतिनिधी /बेळगाव
हजारो रुपये फी भरूनही विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा देण्यास शाळा प्रशासन कमी पडत आहेत. स्कूल बसमध्ये कोंबलेले विद्यार्थी, बसची दुरुस्ती, प्रशिक्षित चालक नसल्याने अनेक अपघात होत आहेत. त्यामुळे खासगी शाळांमध्ये भरमसाट फी भरूनही विद्यार्थ्यांची काळजी घेतली जात नसल्याचे प्रकार घडत आहेत. प्रशासनाने स्कूल बसबाबत तयार केलेली नियमावली धाब्यावर बसवून विद्यार्थ्यांना वेठीस धरून शाळांचा प्रवास सुरू आहे.
शनिवारी सौंदत्ती येथे स्कूल बसचालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव बस पलटी झाली. यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी 28 विद्यार्थ्यांचा जीव धोक्मयात आला होता. ही चूक चालकाची असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे पुन्हा एकदा स्कूल बसच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यापूर्वीही स्कूल बसचे अपघात होऊन विद्यार्थी जखमी झाल्याचे प्रकार घडले आहेत.
शाळांमध्ये प्रवेश घेताना स्कूल बसची भरमसाट फी भरून घेतली जाते. प्रशासनाने ठरवून दिलेल्या नियमावलीनुसारच शाळांना स्कूल बस चालवावी लागते. परंतु जिल्हय़ातील अनेक शाळांच्या स्कूल बस वेळच्या वेळी दुरुस्त न केल्याने केव्हा बंद पडतील? अथवा अपघात होईल, याची शाश्वती नाही. जिल्हय़ातील एकूण पाच लाख विद्यार्थी दररोज ऑटोरिक्षा, कार, स्कूल बस आणि परिवहनच्या बसने प्रवास करत असतात.
सुरक्षा नियमावली काय आहे?
प्रत्येक शाळेत वाहन सुरक्षा समिती स्थापन करून समितीने वेळच्या वेळी वाहनांची तपासणी करणे गरजचे आहे. वाहन चांगल्या स्थितीत तसेच त्याचे परमीट असणे आवश्यक आहे. सर्व कागदपत्रे, स्पीड गव्हर्नर, सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, वाहनाचा विमा उतरविणे सक्तीचे आहे. वाहनात अग्निशमन यंत्रणा, प्रथमोपचार पेटी आवश्यक आहे.
नियमावलीचे पालन करण्याची सूचना
बेळगावमधील सर्व शाळांना स्कूल बस नियमावलीचे पालन करण्याची सूचना केली आहे. नियमावली न पाळणाऱया शाळांवर कारवाई केली जाणार आहे. त्याचबरोबर रस्ता सुरक्षा नियमावलीबाबत जागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असल्याचे बेळगावचे आरटीओ शिवानंद मगदूम यांनी सांगितले.