प्रतिनिधी/ खंडाळा
कोरोना कालावधीत जोपर्यत स्कूल बस बंद राहातील,तोपर्यत सर्व प्रकारच्या करामध्ये शंभर टक्के माफी मिळावी.यासह विविध मागण्यांचे निवेदन तहसिलदार यांना देण्यात आले.दरम्यान,मागण्यांची दखल न घेतल्यास दि. 5 रोजी तीव्र आंदोलन छेडले जाईल,असा इशारा विद्यार्थी वाहातुकदार महासंघाच्यावतीने देण्यात आला आहे.
खंडाळयाचे तहसिलदार दशरथ काळे यांची पश्चिम महाराष्ट्र विद्यार्थी वाहतूक महासंघाचे विभागीय उपाध्यक्ष रियाज शेख यांनी भेट घेवुन विविध मागण्यांचे निवेदन दिले.महासंघाच्यावतीने देण्यात आलेल्या निवेदनात नमुद केले आहे की,मार्च 2020 पासून कोरोना महामारीमुळे शाळा बंद आहेत.त्यामुळे शालेय विद्यार्थी वाहतूकदारांची अवस्था बिकट असुन अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.
दरम्यान, कोरोना कालावधीत जोपर्यत स्कूल बस बंद राहातील,तोपर्यत सर्व प्रकारच्या करामध्ये शंभर टक्के माफी द्यावी. त्यानंतर पुढील काळात शाळा सुरू झाल्यानंतर विना अट, विना दंड वाहनांचे पासिंग करण्यात यावे, स्कूल बस धारकांच्या वाहनांचे हप्त्याना व्यवसाय सुरू होईपर्यत स्थगिती द्यावी,व्याज आणि दंड न आकारण्याबाबत सर्व बँकांना आदेश देण्यात यावेत.यासह अन्य मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे.विद्यार्थी वाहातुकदार महासंघाच्या मागण्यांची दखल न घेतल्यास दि. 5 रोजी तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा ही यावेळी देण्यात आला. यावेळी महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते.