प्रतिनिधी / जयसिंगपूर
नामांकीत भारतीय उद्योगसंस्था संजय घोडावत ग्रुपची हवाई सेवा शाखा, स्टार एअरने अलीकडे त्यांच्या बहुप्रतीक्षित विमान सेवेचे लॉन्च केले. बेळगावी आणि आसपासचे नागरीक बऱ्याच काळापासून या सेवेच्या प्रतीक्षेत होते. बेळगावी विमानतळावरून बेंगळूरू, मुंबई, अहमदाबाद, इंदूर आणि किशनगडला पोहोचण्यासाठी या आधीच सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आता सुलभ आणि सुरक्षित पद्धतीने सुरतदेखील गाठता येईल. कोविड उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करत एका खासगी उद्घाटन सोहळ्यात 21 डिसेंबर 2020 रोजी बेळगावी-सुरत नॉन-स्टॉप सेवेचा शुभारंभ करण्यात आला.
अन्य कोणतीही सेवा (बेळगावी आणि सुरत) दोन प्रमुख भारतीय शहरांना जोडत नसल्याने सध्या स्टार एअरच्यावतीने जोडण्यात येणारी ही सेवा ऐतिहासिक ठरली आहे. त्याशिवाय, येथील नागरिकांना सुरतवरून किफायतशीर दरात अजमेर (किशनगड)पर्यंतचा प्रवास करणे शक्य होईल. आठवड्यातून सोमवार, बुधवार आणि शुक्रवार असे तीन दिवस बेळगावी-सुरत आणि बेळगावी-अजमेर (किशनगड) असे वेळापत्रक स्टार एअरकडून निश्चित करण्यात आले आहे.
“बेळगाव येथील लोकांनी जे प्रेम आणि पाठबळ दिले, त्याकरिता मी त्यांचे आभार मानतो. देशातील सर्वाधिक महत्त्वाच्या शहरांना जोडण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. बेळगावी – सुरत हा प्रवास इतर कोणत्याही पर्यायांचा उपयोग करून हे अंतर कापण्यासाठी 16 तासापेक्षा अधिक वेळ लागतो. आता हा प्रवास या विमान सेवेमुळे केवळ 1 तास 20 मिनिटांवर आला आहे. त्यामुळे या शहरांत प्रवास करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळेल,” असे संजय घोडावत ग्रुपचे मॅनेजिंग डायरेक्टर श्रेणिक घोडावत यांनी सांगितले.
बेळगावी, बागलकोट, गदग, धारवाड, बिजापूर आणि उत्तर कन्नड जिल्ह्यांतील रहिवाशांना या नवीन सेवेचा लाभ होणार असल्याचे तज्ज्ञ सांगतात. त्याचप्रमाणे, बेळगावी आणि गोवा हे अंतर फार दूर नसल्याने गोव्याच्या सीमा भागातील लोकांना पूर्वीपेक्षा सुरत आणि अजमेर (किशनगड) हा प्रवास करणे सुलभ आणि किफायतशीर होणार आहे.
स्टार एअरकडून जानेवारी 2019 दरम्यान स्थापनेपासूनच हवाई संपर्कापासून वंचित असलेल्या शहरांना जोडण्याचे काम चालू आहे. प्रवाशांना सोयीची आणि किफायतशीर हवाई सेवा उपलब्ध होत असल्याने स्टार एअर हे नाव लोकप्रिय झाले आहे.
सुरतवरून हवाई उड्डाणांचे कामकाज सुरू करण्याबरोबरच, स्टार एअरची सेवा सध्या अहमदाबाद, अजमेर (किशनगड), बेळगावी, बेंगळूरू, दिल्ली (हिंडन), कलबुर्गी, इंदूर, मुंबई, सुरत, तिरुपती आणि हुब्बळी अशा 11 महत्त्वाच्या भारतीय शहरांतून चालू आहे. लवकरच जोधपूर (राजस्थान) आणि नाशिक (महाराष्ट्र) येथूनही विमानसेवा सुरू करण्याची योजना आहे.