उसळत्या गोलंदाजीची मला चिंता नाही!
मेलबर्न :
अलीकडील काही वर्षात भारतीय संघाची जलद गोलंदाजी लाईनअप अतिशय भक्कम झाली असून उसळत्या गोलंदाजीच्या बळावर संघाने भल्याभल्या दिग्गजांना जेरीस आणले आहे. ऑस्ट्रेलियाचा रनमशिन स्टीव्ह स्मिथ मात्र भारताच्या जलद गोलंदाजांची आपल्याला फारशी चिंता वाटत नाही, असा दावा केला आहे. जर भारतीय गोलंदाजांनी उसळत्या गोलंदाजीवर भर दिला तर ती बाब आमच्या पथ्यावरच पडेल, असेही तो म्हणाला.
‘मी माझ्या कारकिर्दीत सातत्याने जलद गोलंदाजांचा, त्यांच्या उसळत्या माऱयाचा सामना केला आहे आणि अशा गोलंदाजांना सामोरे जाताना मला फारशी अडचण जाणवलेली नाही. मी त्यांच्या गोलंदाजीवर सहजपणे धावांची आतषबाजी केली आहे. तूर्तास, थांबा व पहा, असेच आमचे धोरण असणार आहे’, असे स्मिथने पुढे नमूद केले.
यापूर्वी, 2019-2020 हंगामात न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या मालिकेत प्रतिस्पर्धी नील वॅग्नरने स्टीव्ह स्मिथला तब्बल 4 वेळा बाद केले होते. किवी गोलंदाज वॅग्नरने त्यावेळी स्मिथवर उसळत्या गोलंदाजीचा सातत्याने मारा करत त्याला अक्षरशः जेरीस आणले होते. स्मिथने तरीही त्या 3 कसोटी सामन्यांच्या मालिकेत 43 धावांची सरासरी नोंदवली होती.
‘ज्याप्रमाणे प्रतिस्पर्धी गोलंदाज आपल्याला बाद करण्यासाठी जंग जंग पछाडत असतो, त्याचप्रमाणे आपण त्यांच्यावर वर्चस्व गाजवण्यासाठी प्रयत्नशील असतो. त्यांच्या गोलंदाजीचा शक्य तितका समाचार कसा घेता येईल, यावर आपले लक्ष असते. भारताविरुद्ध मालिकेतही अशा रितीने जुगलबंदी रंगत राहिली तर आश्चर्याचे कारण नसेल’, असे स्मिथ शेवटी म्हणाला. भारतीय जलद गोलंदाजांच्या लाईनअपमधील जसप्रित बुमराह व मोहम्मद शमी यांच्याविरुद्ध खेळताना स्मिथचा पवित्रा कसा असेल, याचे यावेळी अर्थातच औत्सुक्य असणार आहे.