केवळ घोषणाच, अद्यापही पुरेशी माहिती नाही
प्रतिनिधी/ रत्नागिरी
हृदयविकाराचा झटका आल्यानंतर रूग्णाला त्वरीत उपचार मिळावेत, या हेतूने आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ‘स्टेमी’ प्रकल्पाची घोषणा केली होती. या घोषणेला 15 दिवस उलटले तरी जिल्हा प्रशासनाला अद्याप या प्रकल्पाबाबत पुसटशी कल्पना देण्यात आली नाही. रत्नागिरीसह राज्यातील 10 जिल्हय़ांना यासंदर्भात कोणतेही परिपत्रक प्राप्त न झाल्याची माहिती संबंधित जिल्हा रूग्णालयांकडून देण्यात आली आहे.
हृदयाला रक्त पुरवठा कमी झाल्याच्या कारणामुळे होणाऱया आजारामुळे मृत्यूचे प्रमाण राज्यात जास्त आहे, हे लक्षात घेवून स्टेमी प्रकल्प सुरू करण्याची घोषणा आरोग्य मत्री राजेश टेपे यांनी 22 जानेवारीला केली होती. या प्रकल्पाच्या माध्यमातून हृदयविकाराचा झटका आलेल्या रूग्णांना गोल्डन अवरमध्ये उपचार देवून त्यांना जीवनदान देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
पहिल्या टप्प्यात 10 जिल्हय़ामध्ये हा प्रकल्प सुरू करण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. स्टेमी प्रकल्प पुणे, नागपूर, औरंगाबाद, नांदेड, अकोला, नाशिक, ठाणे, रत्नागिरी, सोलापूर आणि वर्धा या दहा जिल्हय़ांमध्ये पहिल्या टप्प्यात राबवण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. मात्र या प्रकल्पाबाबत अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता संबंधित जिल्हा प्रशासनाला याबाबत अद्याप पुरेशी माहितीच मिळाली नसल्याचे पुढे आले आहे.