रेल्वे स्टेशन रस्त्यावर खड्डय़ांचे साम्राज्य : कोटय़वधी निधी खर्चून रेल्वे स्टेशनचा मात्र विकास
प्रतिनिधी / बेळगाव
कॅन्टोन्मेंट हद्दीत येणाऱया रेल्वेस्टेशन मार्गाची दुरवस्था झाली आहे. रेल्वे स्टेशनपासून बाजारपेठेला जोडणाऱया रस्त्यावर खड्डय़ांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. कोटय़वधी निधी खर्चून रेल्वे स्टेशनचा विकास करण्यात येत आहे. मात्र, स्टेशनरोडचा विकास करण्याकडे रेल्वे खात्याने कानाडोळा केला आहे. त्यामुळे वाहनधारकांची गैरसोय होत असून, रस्त्याचा विकास करण्याची मागणी करण्यात येत आहे.
शहरातील विविध रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात येत आहे. मात्र, स्टेशनरोड विकासापासून वंचित आहे. मागील तीन वर्षांपासून या रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली नाही. दरवषी केवळ डागडुजी करण्यात येते. कायमस्वरुपी समस्यांचे निवारण करण्याच्यादृष्टीने संपूर्ण रस्त्याचे डांबरीकरण करण्याकडे प्रशासनाने कानाडोळा केला आहे. परिणामी रेल्वे स्टेशनपासून मुख्य पोस्ट कार्यालयापर्यंत संपूर्ण रस्ता खड्डेमय बनला आहे. मोठमोठे खड्डे निर्माण झाल्याने वाहनधारकांना ये-जा करण्यास अडचण होत आहे. या रस्त्यावरून पादचाऱयांना चालत जाणेही कठीण होऊन बसले आहे.
रेल्वे स्टेशनवरून बाजारपेठेत येण्यासाठी नागरिक या रस्त्याचा वापर करीत असतात. शहराच्या दक्षिण भागात असलेल्या विविध गावांच्या बसेस रेल्वेस्थानक परिसरात थांबत असल्याने नागरिक येथून चालत बाजारपेठेत येतात. गोगटे सर्कलकडून येणारे वाहनधारक या रस्त्याने ये-जा करीत असतात. पण हा रस्ता खूपच खराब झाला असल्याने पादचाऱयांसह वाहनधारकांची गैरसोय होत आहे. येथील पथदीप बंद असून ते दुरुस्त करण्यासाठी अनेकवेळा तक्रारी करण्यात आल्या, पण याची दखल कॅन्टोन्मेंट बोर्डने घेतली नाही. हा रस्ता कॅन्टोन्मेंट बोर्डकडे येत नसून रेल्वे खात्याच्यावतीने रस्त्याची देखभाल करण्यात येते. त्यामुळे कॅन्टोन्मेंट बोर्डकडून रस्त्याचा विकास करण्यात आला नसल्याचे सांगण्यात आले.
या रस्त्याला जोडणाऱया पोस्टमन चौकातील रस्त्याची दुरवस्था झाली आहे. पेव्हर्स घालून रस्ता दुरुस्त करण्यात आला होता. सध्या संपूर्ण पेव्हर्स उखडून चौकात मोठा खड्डा निर्माण झाला आहे. या चौकातील रस्त्याची दुरुस्ती करण्याकडे कॅन्टोन्मेंट बोर्डने दुर्लक्ष केले आहे. स्टेशनरोड आणि चौकातील रस्त्याच्या दुरुस्तीबाबत रेल्वे खाते व कॅन्टोन्मेंट बोर्ड एकामेकांकडे बोट करून जबाबदारी झटकत आहेत. त्यामुळे या रस्त्याचा विकास रखडला आहे. सदर चौक आणि रस्त्यावर रहदारी जास्त असल्याने रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.