रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने नागरिकांचा प्रश्न
प्रतिनिधी /बेळगाव
शहरवासियांच्या सुविधेसाठी शहरातील प्रमुख रस्त्यांचा विकास करण्यात आला आहे. मात्र नेहमी वर्दळीचा आणि जवळच्या असलेल्या स्टेशन रोडच्या दुरुस्तीकडे महापालिका, कॅन्टोन्मेंट आणि रेल्वे खात्यानेदेखील कानाडोळा केला आहे. संपूर्ण शहरवासियांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या रस्त्याला कोणी वाली आहे का? असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे.
स्मार्ट सिटी संकल्पनेतून शहर आणि उपनगरांतील प्रमुख रस्त्यांचा विकास करून सुसज्ज करण्यात आले आहेत. स्मार्ट सिटी योजनेंतर्गत स्मार्ट बसथांबे, बसस्थानकांचा विकास तसेच रेल्वे स्टेशनचा विकास करण्यात येत आहे. कोटय़वधी निधी खर्च करून संपूर्ण शहर स्मार्ट बनविण्यासाठी प्रशासनाने आटापिटा चालविला आहे. मात्र स्मार्ट बसस्थानक आणि स्मार्ट रेल्वेस्थानकासमोरील रस्त्याचा विकास करण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. रस्त्याच्या विकासाकडे दुर्लक्ष करून स्मार्ट सिटीची संकल्पना पूर्ण होणार आहे का? अशी विचारणा नागरिक करीत आहेत. रेल्वेस्टेशन ते पोस्टमन सर्कल व पाटील गल्लीला जोडणाऱया रस्त्यावरून संपूर्ण शहरातील वाहनधारक ये-जा करीत असतात. स्टेशन रोड आणि बसस्थानकावरून केवळ कॅन्टोन्मेंट हद्दीतील रहिवासी प्रवास करीत नाहीत. संपूर्ण शहरातील नागरिक या रस्त्याचा वापर करतात. त्यामुळे या रस्त्याचा विकास करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. मात्र हा रस्ता रेल्वे खात्याच्या अखत्यारित येत असल्याने कॅन्टोन्मेंट आणि महापालिका प्रशासनाने कानाडोळा केला आहे. त्यामुळे या रस्त्याची दुरवस्था झाली असून खड्डय़ांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. अशातच या रस्त्यावरील पथदीप बंद असल्याने अंधार पसरला आहे. त्यामुळे या रस्त्याचा विकास करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी होत आहे.