खडी घातल्याने दुचाकी वाहनधारकांचे हाल : रस्त्याचे डांबरीकरण त्वरित करण्याची नागरिकांची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
महापालिकेच्यावतीने विविध विकासकामे हाती घेऊन शहराचा विकास करण्याचा प्रयत्न चालविला आहे. संपूर्ण शहराचा विकास झाला मात्र महत्त्वाचा म्हणून ओळखल्या जाणाऱया स्टेशन रोडकडे दुर्लक्ष झाले आहे. रेल्वे खात्याच्या दुर्लक्षामुळे गेल्या पाच वर्षांपासून रस्त्याचे काम रखडले असून हा रस्ता विकासापासून वंचित आहे. त्यामुळे या रस्त्याचे भाग्य कधी उजाडणार अशा प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत
आहेत.
शहराच्या विकासासाठी कोटय़वधी रुपयांच्या निधीचा विनियोग करून रस्त्यांचे डांबरीकरण तसेच गटारीचे बांधकाम करण्यात आले आहे. पाटील गल्ली रोडचेही रुंदीकरण करून विकास साधण्यात आला आहे. शहर आणि उपनगरांतील काही प्रमुख रस्त्यांचे रुंदीकरण आणि डांबरीकरण करण्यात आले. मात्र स्टेशन रोडच्या विकासासाठी महापालिका आणि कॅन्टोन्मेंट बोर्ड या स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रयत्न अपुरे पडत आहेत. शहरातील इतर रस्त्यांप्रमाणे स्टेशन रोडदेखील शहरवासियांसाठी तितकाच महत्त्वाचा आहे. रेल्वेने येणाऱया प्रवाशांसाठी हा रस्ता एकदम सोईचा आहे. यामुळे रस्त्याच्या डांबरीकरणाची मागणी करण्यात येत आहे. पण या रस्त्याचे डांबरीकरण गेल्या पाच वर्षांपासून रखडले आहे. येथील काही परिसर महापालिकेच्या आणि कॅन्टोन्मेंट बोर्डच्या कार्यक्षेत्रात येतो. स्टेशन रोड रेल्वे खात्याच्या कार्यक्षेत्रात येतो. यामुळे या रस्त्याचे डांबरीकरण कोण करणार हा वाद गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. परिणामी रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम रखडले असून नागरिकांचे हाल होत आहेत. अलिकडे रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी खडी घालण्यात आली आहे. पण या खडीमुळे दुचाकी वाहनधारकांच्या समस्येत आणखी भर पडली असून वाहने घसरण्याचे प्रकार घडत आहेत. परिणामी अपघाताचे प्रमाण वाढले आहेत.
या रस्त्याच्या डांबरीकरणाची मागणी गेल्या कित्येक वर्षांपासून केली जात आहे. पण याकडे लोकप्रतिनिधीसह सर्वांचे दुर्लक्ष झाले आहे. वास्तविक पाहता हा रस्ता रेल्वे खात्याच्या कार्यक्षेत्रात येत असल्याने रेल्वे खात्याकडून परवानगी मिळवून रस्त्याच्या डांबरीकरणासाठी प्रयत्न लोकप्रतिनिधीनी करण्याची गरज आहे. पण नागरिकांच्या समस्येबाबत खासदारांना कोणतेच सोयरसुतक नसल्याची टीका नागरिक करीत आहेत.