नाटय़कर्मी डॉ. संध्या देशपांडे यांचे प्रतिपादन : मंथन कल्चरल ऍण्ड सोशल वेल्फेअर सोसायटीतर्फे 34 वे महिला साहित्य संमेलन
प्रतिनिधी / बेळगाव
आपल्या समकालीन नाटकातील स्त्री प्रतिमांकडे पाहताना स्त्रियांनी स्वतंत्र आयुष्य जगण्याचे घेतलेले निर्णय पुरुष व्यवस्थेत फसलेले दिसतात. पंखांना असणारी त्यांची पावलांची ओढ कमी होताना दिसते आहे. अर्थात नाटकामधील स्त्रियांचे चित्रण हे बहुतांशी पुरुषांनी केलेले चित्रण आहे. त्यामुळे स्त्रियांच्या लिहिते होण्याची नाटय़क्षेत्राला आवश्यकता आहे. त्या जेव्हा अधिक लिहितील तेव्हा सशक्त, सुजाण व परिपक्व अशा स्त्री व्यक्तीरेखा आपण अनुभवू, असा विश्वास साहित्यिका, लेखिका, नाटय़कर्मी डॉ. संध्या देशपांडे यांनी व्यक्त केला.
मंथन कल्चरल ऍण्ड सोशल वेल्फेअर सोसायटीतर्फे आयोजित 34 व्या महिला साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा या नात्याने त्या बोलत होत्या. वरेरकर नाटय़ संघाच्या सभागृहात आशा मनोहर साहित्य नगरीमध्ये, झालेल्या या संमेलनाच्या डॉ. सरोजिनी बाबर व्यासपीठावर मंथनच्या अध्यक्षा शोभा लोकूर व निना जठार, प्रिया कवठेकर, सावित्री कळ्ळीमनी, श्रुती परांजपे, मनीषा नाडगौडा या कार्यकारिणी सदस्या व हिंदवाडी महिला मंडळाच्या अध्यक्षा सुमती कुदळे उपस्थित होत्या.
‘समकालिन मराठी नाटकातील बदलत्या स्त्री प्रतिमा’ या विषयावर बोलताना डॉ. संध्या देशपांडे यांनी 40 वर्षांच्या कालखंडातील नाटकांचा आढावा घेतला. 1960 पर्यंत स्त्रियांची परिस्थिती फारशी बदलली नव्हती. त्यानंतर स्त्रियांच्या प्रश्नांचा विचार होऊ लागला. नाटकांचा विचार करता 1843 मध्ये ‘सीता स्वयंवर’ या नाटकाने मराठी रंगभूमीची सुरुवात झाली. त्यानंतरच्या 50 वर्षातील नाटकांमध्ये स्त्री अबला, अशिक्षित बरी असाच दृष्टिकोन होता. त्यामुळे पती परमेश्वर मानून खाल मानेने जगणाऱया स्त्री प्रतिमाच आपल्याला या काळात दिसतात.
जागतीकिकरणामुळे बरेच बदल
इप्सेनच्या नाटकाचा प्रभाव नाटकांवर दिसतो. असे सांगून या कालखंडातील नाटकांची वैशिष्टय़े अध्यक्षांनी टिपली. यानंतरच्या आधुनिक काळात सबत्ता, समृद्धी, प्रगती, सामाजिक जाणीव आढळली तरी दुसरीकडे दैन्य, भोगवाद, जडवाद, देशीवाद, मूल्यांचा ऱहास दिसतो. तर 90 नंतर जागतीकिकरणामुळे बरेच बदल घडले. मला माझा निर्णय घेऊ द्या हा बाणेदारपणा ‘शांतता कोर्ट’ मधील बेणारे बाई दाखवतात. त्याचे पडसाद पुढील नाटकात दिसतात. ‘सखाराम बाईंडर मधील चंपा’ ही व्यवस्थेलाच हादरा देते. त्यानंतर कमला, पुत्र कामेष्टी, सावित्री, पुरुष यासह अनेक नाटके पुढे आली. मात्र जागतीकिकरणात जगण्याची धारणाच बदलली.
एकूणच नाटकातून अधोरेखित केलेली स्त्री ही पुरुषांच्या नजरेतून रेखाटली गेलेली स्त्री आहे. असे सांगून आई रिटायर्ड होतेय, चाहूल, चारचौघी अशा नाटकांचा धावता आढावा त्यांनी घेतला. आणि मराठी नाटकातील 80 टक्के स्त्रिया पराभूत आहेत. जागतिकिकरणामध्ये जीवनमूल्ये, प्रश्न बदलले, भौतिक टिकाऊपणा पुढे आला. लोकांच्या गरजा वाढविणे हा भाग सुरू झाला. मात्र सर्व पुरुषांनी केलेले चित्र होते. या पार्श्वभूमिवर स्त्री-पुरुष नात्यांमध्ये परस्परांचा हा विचार येत नाही तोवर नात्याला काहीच अर्थ नाही. स्त्रिया स्वतंत्र होऊन कमावू लागल्या, निर्णय घेऊ लागल्या, परंतु त्यांची पंखांना असणारी पावलाची ओढ कमी होत आहे. अशाच स्त्री प्रतिमा समकालिन मराठी नाटकातून चितारल्या गेल्या. हे चित्र बदलण्यासाठी स्त्रियांनी लेखन करणे, प्रमुख्याने नाटक लिहिणे आवश्यक आहे, असे सांगून डॉ. संध्या देशपांडे यांनी समारोप घेतला.
प्रारंभी मिलन मुतकेकर, राजश्री आठल्ये, श्रुती कामत, रेखा परुळेकर, स्वाती हुद्दार यांनी स्वागतगीत सादर केले. त्यांना तबल्यावर वैभव गाडगीळ व संवादिनीवर योगेश रामदास यांनी साथ दिली. संगीत दिग्दर्शन अर्जना बेळगुंदी यांचे होते. शोभा लोकूर यांनी स्वागत व प्रास्ताविक करून अध्यक्षांचा सत्कार केला. मनीषा नाडगौडा यांनी परिचय करून दिला. विविध क्षेत्रातील महिलांनी बजावलेल्या कामगीरीची माहिती श्रुती परांजपे यांनी करून दिली. सूत्रसंचालन नीना जठार यांनी केले. प्रिया कवठेकर यांनी आभार मानले. विजेत्यांची नावे सावित्री कळ्ळीमनी यांनी वाचली.
दुसऱया सत्रात मनीषा सुभेदार यांच्या अध्यक्षतेखाली स्मरणगाथा हे सत्र झाले. यामध्ये शितल बडमंजी यांनी ‘समिधा’ तर आरती आपटे यांनी ‘सय’ या अत्मचरित्राचा परिचय करून दिला. यानंतर अक्षता आळतेकर यांनी रत्नाकर मतकरी यांची तारीख ही कथा सांगितली. सूत्रसंचालन अपर्णा देशपांडे यांनी केले. रजनी गुर्जर यांनी वंदे मातरम सादर केले. मंथन हा शब्द सार्थ ठरविणारी प्रवेशद्वारावरील रांगोळी प्रिया फडके यांनी रेखाटली होती.